कोरोनाला रोखण्यासाठी देशात सध्या 17 मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान कोरोनाचे वाढते आकडे पाहता हा कालावधी वाढवण्याची शक्यता आहे.त्याच संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता जनतेला संबोधित करणार आहे. यावेळी लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. याआधी मोदींनी सोमवारी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी तब्बल 6 तास व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली होती.
देशात 24 मार्चपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळं आता 17 मेनंतर पुन्हा पुन्हा काही आठवड्यांसाठी लॉकडाऊन वाढवला जाऊ शकतो. यासाठी पंतप्रधानांनी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी याबाबात चर्चा केली. यात नरेंद्र मोदी यांनी सध्यातरी लॉकडाऊनशिवाय इतर कोणताही पर्याय कोरोनाला रोखण्यात असमर्थ असल्याचे सूचित केले. मात्र त्याचबरोबर लॉकडाऊन 4 कसा असेल याची दिशाही त्यांनी या बैठकीत दिली.
असा असू शकतो लॉकडाऊन 4.0
लॉकडाऊन 3 मध्ये राज्यांत जिल्ह्यांची रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली आणि त्यानुसार जनजीवनात सूट देण्यात आली. याचा पुढचा टप्पा आता लॉकडाऊन 4 मध्ये असणार आहे. यात संपूर्ण जिल्हा हा रेड झोन जाहीर न करता, ज्या ठिकाणी कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे, अशी प्रतिबंधित क्षेत्रं म्हणजेच कंटेन्टमेंट झोन वगळता जिल्ह्यात इतर सर्व ठिकाणी जनजीवन सुरळीत राहण्याची शक्यता आहे, असे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत दिले. त्यामुळे रेड झोन म्हणून संपूर्ण जिल्ह्यातील व्यवहार ठप्प न होता, केवळ प्रतिबंधित क्षेत्रातील जनजीवनावरच त्याचा परिणाम होणार आहे. यामुळे देशातील सर्वच राज्यातील आर्थिक व्यवहारही बऱ्याच अंशी सुरळीत होण्याची शक्यता आहे. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी या पर्यायाला सहमती दर्शवली तर चौथ्या डॉकडाऊनच्या टप्प्यात रेड झोन जिल्हे न राहता केवळ काही भाग राहण्याची सक्यता आहे.
परराज्यातील मजूरांना पाठवणार गावी
प्रत्येक राज्यातील परप्रांतीय मजुरांना पुढील 8 ते 10 दिवसांत त्यांच्या राज्यात पाठविण्यात येईल. मजुरांच्या स्थलांतरणामुळे दोन बाबी घडण्याची शक्यता आहे, ज्या राज्यांतून हे स्थलांतर होईल, त्या राज्यांमध्ये मजुरांची कमतरता निर्माण होण्याची शक्यता आहे, तर दुसऱ्या बाजूला, ज्या राज्यांत हे मजूर परततील त्या राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. ज्या राज्यांत रुग्ण संख्या वाढेल, त्या ठिकाणी अधिक तयारीत राहण्याच्या सूचना केंद्राने दिल्या आहेत. सद्यस्थितीत स्थलांतरितांच्या प्रश्नांकडे आणि त्यांच्या मनस्थितीकडे माणुसकीच्या दृष्टीतून पाहण्याची गरजही पंतप्रधानांनी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.