मुंबई: उन्हाळा सुरू होताच थंडगार पेय, रसाळ फळांना अधिक मागणी वाढत असते. यावेळी तर अधिक उष्णता आहे. मात्र असे असतांना सध्या बाजारात आंब्याचा हंगाम सुरू असल्याने कलिंगडाची मागणी रोडावली आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच एपीएमसी फळ बाजारात थंडगार, रसाळ फळांच्या हंगामाला सुरुवात होत असते. आंब्यापाठोपाठ फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात फळ बाजारात कलिंगड दाखल होण्यास सुरुवात होते, तर मार्च, एप्रिलपासून मागणीत वाढत होते. सध्या बाजारात लाल रंगाची रसरशीत, शरीराला थंडावा देणारी कलिंगडे बाजारात मुबलक उपलब्ध झाली असून, त्याची चव चाखण्याकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे, असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
घाऊक बाजारात प्रतिकिलोला ११ ते १२ रुपये दर आहे. तो एप्रिलमध्ये १५ ते १६ रुपये बाजारभाव होता. एपीएमसीत आता आंब्याची आवक जास्त होत असून, इतर फळांची मागणी कमी आहे. बहुतांशी ग्राहक आंबा खरेदीकडे वळला आहे. त्यामुळे बाजारात कलिंगडाला म्हणावी तशी मागणी नाही. एपीएमसीत सध्या महाराष्ट्रासह तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक येथून आवक होते. सध्या बाजारात कलिंगडाच्या १०० ते १३० गाड्या दाखल होत असल्या तरी त्याला मागणी नाही.