मुंबई : शिवसंग्रामचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांचं कार अपघातात निधन झालं. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर रविवारी पहाटेच्या सुमारास त्यांच्या कारचा अपघात होऊन मेटे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचे पार्थिव हे काल मुंबईवरून बीडमध्ये अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आले. 'मराठा समाजाला न्याय मागण्यासाठी विनायक मेटे यांनी जो लढा दिला, तो वाया जाऊ देणार नाही. हा आमचा शब्द आहे. विनायक मेटे यांचे बलिदान सर्वसामान्यांचं सरकार व्यर्थ जाऊ देणार नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनायक मेटे यांना श्रद्धांजली वाहिली. विनायक मेटे यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आले होते. मेटे यांना श्रद्धांजली देण्यासाठी अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली. मेटे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजलीपर भाषणात मेटे यांच्या आठवणींना उजाळा दिला.
एकनाथ शिंदे म्हणाले, ' कुणाचाही विश्वास बसेल अशी घटना नव्हती. काल बैठक आयोजित केली होती. मी सुद्धा बैठकीला जाणार होतो, तशा सूचना दिल्या होत्या. तेवढ्यात मेटे यांच्या अपघात झाल्याची बातमी आली. मनाला न पटणारी, मनाला वेदना देणारी घटना घडली. काही माणसं आपल्या कुटुंबापुरती मर्यादित नसतात. त्यांची एक तळमळ असते. ती म्हणजे समाजाला काहीतरी मिळवून देण्याची. त्यांनी मला कधीही व्यक्तिगत कामे सांगितली नाहीत. नेहमी लोकांची कामे सांगायचे'.
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, ' विनायक मेटे यांचा एकच ध्यास होता, तो म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. समाजाला सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत. मला भेटले आणि म्हणाले, आता नक्कीच मराठा समाजाला न्याय मिळेल'. त्यांची तळमळ मी पाहिली आहे. कधी कधी रात्रीच्या २-३ वाजेपर्यंत या विषयावर चर्चा करायचे. कधीही त्यांना उशीर झाला असे म्हणाले नाही. समाजाचे प्रश्न सोडवणारी अशी दुर्मिळ माणसे फार कमी आहेत. त्यांचं अपघाती निधन हे मराठा आरक्षण बैठकीसाठी येताना झाले. मनला चटका लावणारी घटना आहे'.
विनायक मेटे यांनी मराठा समाजासाठी जो संघर्ष केला, तो वाया जाऊ दिला जाणार नाही. आमचं सरकार मराठा आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही. मेटे यांचे बलिदान हे मराठा समाजासाठी आहे. आपलं सरकार हे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. संपूर्ण मंत्रिमंडळाची तीच भावना आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.