महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित राज ठाकरे यांना दिलेला शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अवघ्या 12 तासात पूर्ण केला आहे. पुण्यात अडकलेल्या एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना आज त्यांच्या घरी पाठवण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांची पहिली बस आज (गुरुवारी) अहमदनगरला रवाना झाली.
एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षां अनेक विद्यार्थी पुण्यामध्ये अडकले होते. त्यांनी घरी जाण्याची मागणी केली असता विद्यार्थ्यांशी काल अमित ठाकरे संवाद साधला होता. त्यानंतक अमित ठाकरे यांनी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न मांडला.
दोन दिवसांत या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी सोडण्यात येईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. त्यावर आज पहिली बस अहमदनगरला रवाना झाली आहे. '@yadravkar व #अमितठाकरे आज आपल्या प्रयत्नांनामुळे लालपरी विध्यार्थ्यांना घेऊन घरी चालली. आम्हास खात्री आहे पुण्यातील प्रत्येक विध्यार्थी जो पर्यंत जाणार नाही तो पर्यंत आपण नक्कीच पाठपुरावा करणार सलाम आपल्याला' अशा प्रकारचं ट्वीट एमपीएससी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य’ने केलं आहे.
दरम्यान, याशिवाय अमित ठाकरें यांनी डॉक्टरांना चार हजार हायप्रोटिन्सयुक्त खाद्यपदार्थांच्या पॅकेट्सची मदत केली आहे. यापूर्वी अमित ठाकरे यांनी निवासी डॉक्टरांना PPE किट्स, मास्क आणि बेडशिट्स वाटप केले होते. राज्यात कोरोना विषाणू (covid 19) व अन्य आजारांच्या उपचारासाठी जी रुग्णालये कार्यरत आहेत. त्यांच्या बेड्सची क्षमता स्पष्टपणे नागरीकांना माहीत नाही, त्यामुळे काही नागरीकांना ऐन आजारात एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात पाठवले जात आहे. तरी रुग्णाचा त्रास कमी करण्यासाठी अमित ठाकरे यांनी पत्र लिहून एक उपाय राज्य सरकारला सुचविला होता.