चीनच्या वुहानपासून पसरलेला जगभरात वेगानं कोरोनाचा संसर्ग पसरला. कोरोनाचा वेगानं पसरणारा संसर्ग टाळण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझर बंधनकारक करण्यात आलं आहे. भारतातही 14 हजारहून अधिक रुग्ण दररोज वाढत असल्यानं चिंता व्यक्त होत आहे.
सरकार आणि आरोग्य संघटनेकडून वारंवार आवाहन करूनही अजूनही बरेचजण मास्क वापरण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचं किंवा योग्य पद्धतीनं मास्क वापरत नसल्याचं लक्षात आल्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये महापालिका आयुक्त आणि पोलिसांनी कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली. सार्वजनिक ठिकाणी किंवा प्रवास करताना मास्क वापरणं बंधनकारक आहे. विना मास्क कोणीही आढळल्यास त्याला दंड आकारण्यात येईल अशी सूचना विभागीय आयुक्त डॉ.दीपक महेसेकर यांनी पोलिसांना दिल्या आहेत.
विना मास्क सार्वजिक ठिकाणी फिरणारे, सार्वजिक ठिकाणी उभे असणारे किंवा गाडीवरून प्रवास करणाऱ्या व्यक्तींना 500 ते 1000 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. याशिवाय पान, गुटखा खाऊन किंवा त्याशिवायही सार्वजिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तींना 500 ते 1000 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत तसंच अनुषांगिक अधिनियमान्वये कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
दररोज निदान होणाऱ्या रुग्णांच्या एक दिवसाची संख्या थोडी कमी झाल्याचं मंगळवारी दिसलं. मागचे सात दिवस दररोज किमान 3700 ते 4000 दरम्यान रुग्णवाढ होत होती. ती मंगळवारी 3214 वर आली. महाराष्ट्राचा कोविड मृत्यूदर देशाच्या तुलनेत अजूनही जास्तच आहे. गेल्या 48 तासांत 75 तर आधीच्या काही दिवसांतले मिळून 173 असे 248 कोरोना मृत्यू राज्यात नोंदले गेले. 1925 रुग्णांना बरं होऊन डिस्चार्ज देण्यात आला