नवी दिल्ली, 06 मे : कोरोना व्हायरसचा संसर्ग वेगानं वाढत आहे. देशभरात आतापर्यंत 31 हजारहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. वेगानं पसरणाऱ्या कोरोनावर ठोस असं औषध मिळालं नाही. त्यासाठी जगभरातील देश प्रयत्न करत आहेत. वॅक्सिन तयार करण्यासाठी भारतातही काही कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे. भारतात 5 वॅक्सिन अंतिम टप्प्यात असून लवकरच त्यांची ट्रायल होणार असल्याची माहिती मिळत आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लस शोधणाऱ्या डॉक्टरांच्या टास्क फोर्ससोबत मंगळवारी बैठक घेतली. या बैठकीत कोरोनावर प्रतिबंध करणारी लस शोधण्यण्याबाबत आढावा घेतला आहे. या व्हायरची लस शोधण्याची मोहीम कुठंपर्यंत आली आहे आणि किती वेळ लागू शकतो याबाबतही चर्चा केली. सध्या करोनाविरोधात लढण्यासाठी विविध प्रकारच्या 30 लसींवर काम सुरु आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आणि होऊ नये यासाठी औषध तयार करण्यामध्ये सर्वच देश प्रयत्नशील आहेत. त्यामध्ये सध्या 5 औषध अंतिम टप्प्यात आली आहेत. ही औषध तयार झाली की असून त्यांची लवकरच चाचणी कऱण्यात येईल असं सांगितलं जात आहे. त्यासाठी काय आवश्यक आहे आणि सरकारकडून कोणत्या संसाधनांची गरज आहे याची माहितीही पंतप्रधान मोदींनी घेतली आहे.
औषध, लसी आणि तपासणी या विषयांवर हॅकॅथन आयोजित केले जावे आणि त्यासाठी स्टार्टअप कंपन्यांनीही पुढे यावे, अशी सूचना पंतप्रधान मोदींनी केली. भारतातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही लस तयार करण्याच्या अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती मिळत आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठाबरोबर या लसीच्या निर्मितीवरही कंपनी वेगाने काम करत आहे. कोरोना कालावधीत भारतात बरेच यशस्वी प्रयोग केले गेले आहेत, त्यापैकी एक कोरोना संक्रमण तपासणीसाठी स्वस्त रॅपिड किट, मास्क व्हेंटिलेटर देखील मोठ्या प्रमाणात तयार केले जात आहेत.