दोन महिन्यानंतर आता देशातले व्यवहार पूर्ववत होत आहेत. 8 जूनपासून आता मंदिरं आणि हॉटेल्स सुरू होत आहेत. हे सुरू करताना सरकारने काही अटीही घातल्या आहेत. प्रत्येकाने सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं, मास्क वापरणं, सॅनिटायझरचा वापर करणं या गोष्टी बंधनकारक करण्यात आल्या आहेत. मात्र काही मंदिरातल्या पुजाऱ्यांनी चक्क सॅनिटायझरचा वापर करायला विरोध केला आहे. यात अल्कोहल असल्याने ते मंदिरात वापरलं जाऊ नये अजब दावा त्यांनी केलाय.
गेली दोन महिने मंदिरं बंद आहेत. तिरुपतीच्या जगप्रसिद्ध बालाजी मंदिरापासून ते शिर्डीपर्यंत आणि थेट गावातल्या ग्रामदेवतेपर्यंत सगळी मंदिरं बंद आहेत.
सॅनिटायझरमध्ये अल्कोहलचं प्रमाण जास्त असते. निर्जंतुकिकरण करण्यासाठी त्याची आवश्यकता असते. सगळ्याचं तज्ज्ञांनी त्याच्या वापराला मान्यता दिलेली आहे. मात्र पुजाऱ्यांनी दिलेलं कारण अजब असून त्यांना त्याची योग्य प्रकारे माहिती देण्यात यावी असा सल्ला डॉक्टरांनी दिलाय.
देशभरात कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 2 लाख 36 हजार 657 झाली आहे. रुग्णांच्या संख्येत भारताताने आता इटलीला पछाडले आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत भारत जगात चौथे क्रमांकावर पोहोचला आहे.
गेल्या 24 तासांत देशात एकूण 9887 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 294 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, महाराष्ट्र आता एकूण रुग्णांच्या बाबतीत चीनलाही मागे टाकणार आहे.
महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 80 हजारांवर गेला आहे. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 2436 नवे रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारी तर महाराष्ट्रात 139 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची एकूण संख्या 80229 झाली आहे. पुढील दोन- तीन दिवसांत महाराष्ट्र कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येबाबत चीनला मागे टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही