राज्यसभा निवडणुकीच्या (Rajyasabha Election 2020) पार्श्वभूमीवर राजस्थानमध्ये पुन्हा एकदा राजकीय नाट्याला सुरुवात झाली आहे. सरकार अस्थिर करण्यासाठी आमच्या आमदारांना भाजपकडून पैशाचं आमिष दाखवलं जात असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. तसंच काँग्रेसकडून या पार्श्वभूमीवर थेट ACBकडे तक्रार करण्यात आली आहे.
'काँग्रेस आणि अपक्ष आमदारांना जाळ्यात ओढण्यासाठी पैशाचं आमिष दाखवलं जात आहे. हे प्रयत्न लोकशाही प्रक्रियेच्या विरोधात आहेत. तसंच हा एक गुन्हादेखील आहे. त्यामुळे अशा लोकांवर कठोर कारवाई होण्याची गरज आहे,' असं काँग्रेसने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. राज्यसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेस चांगलीच सावध झाली असून काँग्रेसने आपले आमदार हॉटेलमध्ये हलवण्यास सुरुवात केली असल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी काँग्रेस आणि अपक्ष आमदारांची बुधवारी एक बैठकही बोलावण्यात आली होती. त्यानंतर आमदारांना हॉटेलमध्ये नेण्यास सुरुवात झाली. राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून मोठी ताकद लावण्यात येणार आहे, हे तर स्पष्टच आहे. त्यामुळे राजस्थानमध्ये सत्तेत असणारी काँग्रेस कोणतीच जोखीम पत्करणार नसल्याचं दिसत आहे.
राजस्थानमध्ये 3 जागांसाठी होणार मतदान
राजस्थानमध्ये राज्यसभेच्या तीन जागांसाठी 19 जून रोजी मतदान होणार आङे. काँग्रेस आणि भाजपचे प्रत्येकी दोन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे मतदानाची तारीख जवळ येताच राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जास्तीत जास्त जाग जिंकण्यासाठी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांना जोर लावला आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार, हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.