तब्बल दोन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर रेल्वेची सेवा आता पूर्वपदावर येत आहे. सोमवार पासून (1 जून) रेल्वेच्या देशभरात 200 रेल्वे गाड्या धावणार आहे. त्याचं बुकिंगही रेल्वेने काही दिवसांपूर्वीच सुरू केलं होतं. 24 मेला पहिल्या लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर देशातली रेल्वे सेवा थांबविण्यात आली होती. आता ही सेवा सुरू होत असल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
या पहिल्या टप्प्यात देशातल्या निवडक मार्गावर 200 रेल्वे गाड्या चालविण्यात येणार आहेत. त्याचा टाईम टेबलही रेल्वेने प्रसिद्ध केला आहे. या गाड्यांचं बुकिंग 21 मे रोजी रेल्वेने सुरू केलं होतं. आरक्षणाचा कालावधी आता 30 दिवसांवरून 120 दिवस करण्यात आला आहे. आजारी व्यक्ती, लहान मुलं यांनी प्रवास टाळावा असं आवाहन रेल्वेने केलं आहे.
हा प्रवास करताना प्रवाशांना काही नियम पाळणेही सक्तीचं करण्यात आलं आहे.
प्रत्येकाला मास्क वापरणं सक्तीचं आहे.
रेल्वे स्थानकावर प्रवासाच्या सुरूवातीला आणि उतरल्यावर स्क्रिनिंग होणार आहे.
सोशल डिस्टन्सिंगचं पालन सक्तीचं करण्यात आलं आहे.
या आधी रेल्वेने मजुरांना आपल्या घरी जाण्यासाठी श्रमिक रेल्वे गाड्या सुरू केल्या होत्या. तर आता रेल्वे तपासणीसांना सुरक्षेसाठी PPE किट देण्यात येणार आहेत.