नवी दिल्ली, 06 जून : गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीन सैन्यामध्ये लडाखच्या सीमेवर तणावाचं वातावरण आहे. चीननं लडाखच्या गॅलवान खोऱ्यात आपलं सैन्य वाढवल्यानंतर भारताकडूनही चीनला प्रत्युत्तर देण्याची तयार करण्यात आली होती. मात्र 2 दिवसांपूर्वी चीननं आपलं सैन्य 2 किमी अंतरानं मागे घेतलं आणि चर्चेसाठीही तयार झाला आहे.
लडाखच्या सीमेवर आज भारत आणि चीन या दोन देशांमध्ये सकाळी 9 वाजता महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर तणाव शांत होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. चीन लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेसह (LAC) पॅंगॉंग त्सो आणि गॅल्व्हन व्हॅलीजवळ वेगानं आपल्या सैन्याचा विस्तार केला. त्यामुळं चिनी सैन्य भारताबरोबर असलेला सीमावाद आणखी वाढवण्याच्या तयारीत असल्याचं दिसत होते त्यामुळे भारतानेही गॅल्व्हन व्हॅलीत सैन्य वाढवलं होतं. दोन्ही देशांमधील तणाव वाढत होता त्याच पार्श्वभूमीवर आज महत्त्वपूर्ण बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.
पूर्व लद्दाखच्या चुशुल सेक्टरमधील मालडो येथे सकाळी बैठकीला सुरुवात होईल. स्थानिक सैनिकांची 12 तर मेजर जनरल अधिकाऱ्यांमध्ये याआधी तीन वेळ चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. याआधी झालेल्या चर्चांमधून कोणताही सकारात्मक तोडगा निघाला नाही. त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीत तरी सकारात्मक तोडगा निघेल का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
लडाखच्या सीमेवर शांतता आणि स्थिरता पुन्हा प्रस्थापित करणं हा या बैठकीचा अजेंडा आहे अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. 4 जूनला चीन सैन्यानं घेतलेली माघार आणि त्यांनंतर होणारी ही चर्चा महत्त्वपूर्ण असल्यानं काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.