नवी दिल्ली, 19 जून : राज्यसभा निवडणुकीचं रणशिंग फुकलं गेलं आहे. 24 जागांसाठी आज (19 जून) मतदान होणार आहे. या निवडणुकीत भाजपला 9 जागांवर विजय मिळवण्याचा विश्वास आहे. त्यामुळे भाजपचं संख्याबळ 84 होऊ शकतं. तसंच एनडीए 100 जागांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानंतर बहुमतासाठी एनडीएला केवळ 22 मतांची आवश्यकता असणार आहे. पावसाळी अधिवेशनात AIADMK, YSRCP, DMK आणि TRS सारखे पक्ष भाजपसोबत जाण्याची शक्यता आहे.
काय आहे राज्यसभेचं गणित?
सध्याच्या स्थितीत राज्यसभेत 224 खासदार आहे. तर 21 जागा रिकाम्या आहेत. 27 जूनपर्यंत एकूण 27 जागा रिकाम्या होतील. आज 19 जागांसाठी मतदान होईल तर 3 जागा नंतर भरल्या जातील. सध्याच्या स्थितीत सभागृहात एनडीएकडे 91 जागा आहेत. तर बिगर एनडीए आणि बिगर यूपीए खासदारांची संख्या 68 इतकी आहे. यूपीएकडे एकूण 61 खासदार असून त्यातील 39 खासदार काँग्रेसचे आहेत. आज होणाऱ्या निवडणुकीतनंतर भाजपचे 9 खासदार वाढण्याची शक्यता आहे, तर त्याचवेळी काँग्रेसचे 2 खासदार कमी होतील.
'या' राज्यात मात्र भाजपला धक्का
मणिपूरमधील भाजप सरकारमधील उपमुख्यमंत्री वाय जॉय कुमार सिंह यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्यासह नॅशनल पिपल्स पार्टीच्या तीन मंत्र्यांनीही राजीनामा दिला. मणिपूरमधील भाजपचे मुख्यमंत्री एम. बिरेन सिंह सरकारवर अस्थिरतेचं संकट घोंगावू लागलं आहे. यासह एक टीएमसी आमदार आणि एका अपक्षानेही सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. आतापर्यंत 9 आमदाराने राजीनामा दिला आहे. त्यामुळे ऐन राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला अडचणींचा सामना करावा लागत आहे.