पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता महत्त्वपूर्ण सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. लडाखच्या गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक संघर्षानंतर ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. भारत-चीन सीमारेषेवरील विवादाबाबत या बैठकीमध्ये सर्व पक्षाच्या नेत्यांसोबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात येणार आहे. या बैठकीत कोणते महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सोमवारी गलवान खोऱ्यात झालेल्या भारत-चीन हिंसक संघर्षामध्ये 20 जवान शहीद झाले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली ही महत्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीला महराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित राहणार आहेत. याशिवाय सोनिया गांधी (काँग्रेस), जेपी नड्डा (भाजप), ममता बॅनर्जी (तृणमूल कॉंग्रेस) एमके स्टालिन (द्रमुक), एडप्पाडी के. पलानीस्वामी आणि ओ. पन्नेरसेल्वम (एआयएडीएमके), एन चंद्रबाबू नायडू (टीडीपी), जगन मोहन रेड्डी (वायएसआर कॉंग्रेस), नितीश कुमार (जद-यू). अखिलेश यादव (समाजवादी पार्टी), डी.राजा (सीपीआय), सीताराम येचुरी (सीपीएम), नवीन पटनायक (बीजद), के. चंद्रशेखर राव (टीआरएस), सुखबीर बादल (अकाली दल), चिराग पासवान (लोक जनशक्ती पार्टी), हेमंत सोरेन (झारखंड मुक्ती मोर्चा) या नेत्यांची बैठकीला उपस्थिती असणार आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लडाखमधील भारत-चीन सीमेच्या परिस्थितीबद्दल चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक घेण्याच्या केंद्राच्या निर्णयाचे स्वागत केलं. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी पक्ष आहे असंही आश्वासन ममता बॅनर्जी यांनी दिलं आहे