नवी दिल्ली, 07 मे : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला असला तरी, कोरोनाबाधितांच्या संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आज देशातील कोरोबाधितांचा आकडा 50 हजार पार केला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतात कोरोनाबाधितांच्या संख्या 52 हजार 952 आहे. तर, आतापर्यंत 1783 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशभरात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 35 हजार 902 आहे आणि आतापर्यंत 15 हजार 266 लोकांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.
जगभरातील कोरोनाबाधितांच्या आकड्यांमध्ये भारत आता 15व्या स्थानी आहे. मात्र कोरोनाबाधितांच्या वाढत्या आकड्यामुळं जगातली खराब परिस्थिती असलेल्या देशांमध्ये भारत सध्या पाचव्या क्रमांकावर आहे. गेल्या 6 दिवसांचा देशाचा ग्राफ पाहिल्यात 1 मे ते 6 मे दरम्यान भारतात 704 लोकांचा मृत्यू झाला. देशात सगळ्यात जास्त रुग्ण हे महाराष्ट्र राज्यात आहेत. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 14 हजार 541 आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा 10 हजारांहून जास्त आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत सर्वात जास्त आकडा वाढला आहे. तर, दिल्लीमध्ये 24 तासांत 428 कोरोना संक्रमित रुग्ण सापडले, यासह दिल्लीतील एकूण संख्या 5 हजार 532 झाली आहे.
गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात सर्वात जास्त 1233 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. तर, 34 लोकांचा मृत्यू झाला आहे. यातील एकट्या मुंबईत 796 प्रकरणे आहेत. तर मुंबईत 25 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 1 लाख 90 हजार 879 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यातील 1 लाख 73 हजार 838 लोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
देशभरात महाराष्ट्रात सर्वाधिक संक्रमण आणि मृत्यूची नोंद झाली आहे. गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक आणि पंजाबमध्येही कोरोना विषाणूचा तीव्र परिणाम झाला आहे. केरळमध्ये आतापर्यंत 500 हून अधिक संसर्गाची नोंद झाली आहे, परंतु बुधवारी राज्यात या कोरोनाचे एकही प्रकरण समोर आले नाही.