राज्यातील कोरोनाबाधितांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना आणि मुंबई व पुण्यासारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत असताना ठाकरे सरकारवर एक गंभीर आरोप करण्यात आला आहे. भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील कोरोना रुग्णांच्या मृत्यूबाबत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
मुंबईतील 950 मृत्यू हे कोरोना मृत्यू म्हणून न दाखवल्याबद्दल आणि यासंदर्भात आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्त्वांचं पालन होत नाही, असा आरोप करत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक सविस्तर पत्र लिहिलं आहे.
'पारदर्शकता हा एकाच मार्गाद्वारे लोकांना सजक करता येऊ शकतं. मात्र मुंबईत कोरोनामुळे झालेल्या तब्बल 950 मृत्यू हे कोरोना मृत्यू म्हणून दाखवण्यात आले नाहीत. या मृत्युंमुळे मुंबईतील स्थितीची दाहकता या स्थितीमुळे स्पष्ट होते. असा गैरप्रकार करणाऱ्यांवर आपण कारवाई करावी,' अशी मागणी या पत्राद्वारे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली आहे
दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) कोव्हिड-19 संशयित रुग्णांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याबाबत नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. यानुसार आता कुटुंबाकडे मृतदेह देण्याआधी प्रयोगशाळेतील निकालांची गरज लागणार नाही.
मंत्रालयाने रविवारी दिल्ली सरकारला पत्र लिहिले की कोव्हिड-19मुळं संशयित रुग्णांच्या लॅबच्या निकालाची वाट न पाहता कुटूंबाकडे सोपवावा, मात्र अंत्यसंस्कार हे सरकारने ठरवलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार होईल. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनीही एका ट्विटद्वारे लोकांना याबद्दल माहिती दिली. कोरोना संशियत रूग्णांचे मृतदेह कुटूंबाकडे देण्यासाठी रिपोर्टची वाट पाहू नये, अशी माहितीही गृह मंत्रालयाकडून ट्वीटद्वारे देण्यात आली आहे. तसेच मृतदेहाच्या अंत्यसंस्कारची पूर्ण खबरदारी घ्यावी असेही म्हटले आहे.