महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकार अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्यावर ठाम आहे. परंतु, यूजीसीने सप्टेंबरपासून परवानगी दिली आहे. त्यामुळे आता शिवसेनेनं थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.
देशातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी शिवसेना नेते व मंत्री, युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेने यूजीसीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे, अशी माहिती युवासेनेचे सचिव वरुन सरदेसाई यांनी सांगितलं आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) अंतिम वर्षाच्या परीक्षा सप्टेंबर अखेरपर्यंत घेण्याचा आदेश काढला आहे. आधीच राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय जाहीर केला होता. तसंच, कोरोनाच्या परिस्थितीत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेता येणार नाही, असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आहे.
मागील आठवड्यातच, युजीसीने दिलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रात सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेणं अशक्य असल्याचं राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा जाहीर केलं होतं.
उदय सामंत यांनी सांगितलं की, 'अंतिम वर्षांच्या परीक्षांसदर्भात आम्ही महाराष्ट्रातील सर्व कुलगुरू आणि विविध शैक्षणिक संस्थांचे संचालकांसोबत चर्चा केली. मात्र, 30 सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेत येणार नाही, अशा प्रतिक्रिया सर्व कुलगूरू आणि शिक्षण संचालकांनी दिली आहे