शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अमरावती हिंसाचारावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि एकूणच भाजपावर सडकून टीका केलीय. तसेच फडणवीसांनी वादग्रस्त वक्तव्य करून काड्या करू नये, असं मत व्यक्त केलंय. हे ठाकरे सरकार आहे. महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे. येथे कारवाई करताना गट, तट, पक्ष पाहिला जात नाही, असंही यावेळी त्यांनी नमूद केलं. ते मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते.
संजय राऊत म्हणाले, “हे ठाकरे सरकार आहे. इथे कारवाई करताना गट तट पक्ष पहिला जात नाही. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यांनी आगीत तेल न टाकता अमरावतीसारख्या घटना घडू नयेत यासाठी शांत राहण्यासाठी काम केलं पाहिजे. अमरावतीसारख्या घटनांचं राजकारण, पेटवापेटवी महाराष्ट्राला परवडणारी नाही. महाराष्ट्र हा काही दंगलीसाठी ओळखला जाता कामा नये. महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य आहे.
“तुम्ही पाहिलं तर अमरावतीच्या शेजारी गडचिरोलीत याच पोलिसांनी २६ नक्षलवाद्यांचा खात्मा केलाय. कायद्यासमोर सगळे समान आहेत. अमरावतीमध्ये दंगल कोणी पेटवली, कोणत्या कारणाने पेटवली, त्यामागे कोण होतं हे देशालाही माहिती आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनाही माहिती आहे आणि अमरावतीमधील जनतेलाही माहिती आहे. वातावरण सगळं शांत झालं असताना उगाचच काड्या करण्याचं काम ना इकडल्यांनी, ना तिकडल्यांनी कोणीही करू नये एवढंच मी महाविकासआघाडीतर्फे त्यांना आवाहन करेल,” असं म्हणत संजय राऊत यांनी फडणवीसांना टोला लगावला
यशोमती ठाकूर यांनी गुप्तचर यंत्रणा अपयश ठरल्याचं मान्य केलं. ज्या दिवशी घटना घडली तेव्हा जिल्हाधिकारी नव्हते, पोलीस नव्हते. सरकारमधील काही मंत्र्यांनाच तसं वाटतंय असं विचारलं असता संजय राऊत म्हणाले, “कधी कधी इंटेलिजन्स फेल होतं. शेवटी तेही माणसंच आहेत. देशभरात अनेक घटनांबाबत इंटेलिजन्स फेल होत असतं. काश्मीर, त्रिपुरामध्ये देखील होतं. असं असलं तरी अमरावतीतील दंगल नियंत्रणात आणली. आज अमरावतीत शांतता नांदत आहे हे महत्त्वाचं आहे.”