बेळगाव जिल्ह्यातल्या मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढल्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या घटनेमुळे कर्नाटकातील सत्ताधारी असलेल्या भाजपवर चहुबाजूने जोरदार टीका होत आहे. मात्र याच मुद्द्यावरून आता महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी शिवसेना आणि काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
'छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कर्नाटकातील मनगुत्ती येथे रातोरात हटवल्याच्या घटनेचा आम्ही जाहीर निषेधच करतो. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सन्मानाने बसवलाच पाहिजे. मात्र पुतळा हटविण्यास जबाबदार असणाऱ्या काँग्रेसच्या स्थानिक आमदारांच्या विरोधात शिवसेना आंदोलन करणार का?', असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे.
दरम्यान, मनगुती गावामध्ये आज मराठी भाषिक महिलांनी आंदोलन केलं. मात्र कर्नाटक पोलिसांनी हे आंदोलन मोडून काढत आंदोलकांना पांगवलं आहे. त्यामुळे गावात पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला. जिल्हा पोलीस प्रमुख निम्बर्गी यांनीही या गावाला भेट दिली आहे, तर गावात सध्या सशस्त्र पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला आहे.
शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्या स्थितीत तात्काळ बसवावा, अशी मागणी सीमाभागातल्या मराठी बांधवांची आहे. आज याबाबत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आंदोलनं झाली. मात्र कर्नाटक राज्य सरकार किंवा जिल्हा बेळगाव जिल्हा प्रशासनाकडून याबाबत अजून पर्यंत कुठलीही माहिती अथवा स्पष्टीकरण देण्यात आलेलं. नाही अजूनही या गावात तणावपूर्ण शांतता आहे.