निसर्ग चक्रीवादळ (nisarga cyclone) अलिबागच्या दिशेनं घोंघावत येत आहे. बुधवारी सकाळी 11 ते दुपारी 1 दरम्यान हे वादळ अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर धडकणार आहे. कोकण किनारपट्टीवर वाऱ्यांचा वेग प्रचंड वाढला असून मालवण वेंगुर्ले गुहागर वेळास रत्नागिरी किनारपट्टीवर वेगाने वारे वाहात आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे.
तर मुंबईसह उपनगरांमध्ये बुधावारी पहाटेपाससून वेगानं वारे वाहात आहेत. हे वादळ जेव्हा धडकेल तेव्हा ताशी 120 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. इतिहासात पहिल्यांदाच मुंबईला (mumbai) मोठा वादळ आणि मुसळधार पावसाचा सामना करावा लागणार आहे. अलिबाग, ठाल नव्हंगाव आणि किहीम समुद्रकिनाऱ्याला या (nisarga cyclone) वादळाचा मोठा धोका आहे.
सध्या "निसर्ग" चक्रिवादळ अलिबाग समुद्रकिनाऱ्यापासून 180 किलोमीटर अंतरावर आहे. सकाळी 11 वाजता हे चक्रिवादळ धडकणार असल्यामुळे या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी सर्व सुरक्षा यंत्रणा सज्ज आणि सतर्क आहेत. दरम्यान किनाऱ्यालगतच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.
चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतील अनेक भागांमधील वीज पुरवठा मंगळवारपासून खंडित करण्यात आला आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनाकडून देण्यात आलं आहे. किनारपट्टीच्या भागातल्या नागरिकांनी घरातच राहणं आवश्यक आहे. 3 आणि 4 हे दोन्ही दिवस महत्त्वाचे आहे. दोन्ही दिवस घरात थांबा. कोणीही घराबाहेर पडू नका असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी नागरिकांना केलं आहे.