राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता मुंबई महानगरपालिकेने पुन्हा एकदा रॅपिड अँटीजन टेस्टिंगचं प्रमाण वाढवलं आहे. पण याद्वारे आम्हाला टार्गेट केलं जात असल्याचा आरोप करत अनेक लोक टेस्ट करायला तयारच होत नाहीत, असं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे पालिकेसमोर नवं संकट उभा राहिलं आहे.
मुंबईतील मंगलदास मार्केटमध्ये अँटिजेन टेस्टिंग घेण्यासाठी सकाळी 11 वाजल्यापासून लावलेल्या कॅम्पमध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अवघ्या 50 जणांनी आपली चाचणी करून घेतली. तीही पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी लोकांना अगदी समजावून सांगितल्यानंतर. त्यात 5 जण कोरोनाबाधित सापडले आहेत. 450 दुकानं आणि 300 कार्यालय असलेल्या या मुंबईतल्या गजबजलेल्या मंगलदास मार्केटमध्ये एरवी 8 हजार कर्मचारी आणि 10 हजार ग्राहक इतकी गर्दी असते. पण कोरोनामुळे अर्धा कामगार वर्ग नसल्याने सध्या 2000 दुकानदार आणि कर्मचारी काम करत आहेत.
यापैकी 3 टक्क्यांपेक्षाही कमी लोकांनी आपली चाचणी केली. कारण लोकांमध्ये सोशल मीडियामधून आलेली चुकीची माहिती. या माहितीनुसार जितके जास्त कोरोनाबाधित सापडणार तितके पालिक कर्मचाऱ्यांना पैसे मिळणार ही अनाठायी भीती त्यांच्यात आहे.
मुंबई मनपाच्या सी-वॉर्डमध्ये येणारे हे मार्केट हळूहळू खुलं होत आहे. इथे येणारे कर्मचारी मुंबईच्या आसपासच्या इतर जिल्ह्यातून येतात. त्यामुळे एखादा पॉझिटिव्ह रुग्ण सापडला तर त्यामुळे अख्खं मार्केट बाधित व्हायला नको म्हणून पालिका काळजी घेत आहे.
कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली तर क्वारन्टाइन व्हायला लागेल, अशीही भीती अनेकांना सतावत आहे. त्यामुळे अनेकजण आपली तपासणी करायची नसेल तर भन्नाट कारणं देऊन पालिका अधिकाऱ्यांना चक्रावून सोडत आहेत