लॉकडाउनच्या काळात आलेल्या भरमसाठ वीज बिलामुळे सर्वसामान्यांना मोठा धक्का बसला आहे. वीज बिल कमी करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे आता राज्य सरकारनेही आता विज कमी करण्यासाठी तयारी केली आहे. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबद्दल महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे.
आज महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत ऊर्जा वीज बिलाचा प्रस्ताव यावर चर्चा होणार आहे. घरगुती वीज बिल माफ निर्णय होण्याची शक्यता आहे. साधरण घरगुती वीजग्राहक यांना सरासरी वीजबिल दरापेक्षा जास्त वीजबिल आले असेल तर त्यात सवलत मिळण्याच्या प्रस्ताव आजच्या बैठकीत सादर केला जाणार आहे.
वीज बिल सरासरीपेक्षा जास्त 100 ते 500 युनिट वीज बिल आलेल्या ग्राहकांना वेगवेगळ्या टप्यात सूट देत दिलासा देण्यावर कॅबिनेटमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून वीज बिलावर पेटलेल्या वादानंतर घरगुती वीजग्राहकांना वीज बिल दरात सूट देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नागपुरात वाढीव वीज बिलाचा बळी
नागपूरमध्ये काही दिवसांपूर्वी वाढीव वीज बिल न भरता आल्यामुळे एका व्यक्तीने आत्महत्या केली होती. 10 ऑगस्ट रोजी नागपूरमधील यशोधानगर पोलीस स्टेशन हद्दीत लीलाधर गायधणे यांनी अंगावर रॉकेल ओतून स्वत: पेटवून घेतले होते. लीलाधर गायधणे यांना एकत्रित तब्बल 40 हजार रुपयांचे वीज बिल आले होते. अचानक एवढ्या मोठ्या रक्कमेचे वीज बिल आल्यामुळे गायधणे अस्वस्थ झाले होते. त्यांनी बिल कमी करावे या मागणीसाठी महावितरणच्या कार्यालयात तक्रार केली होती. पण, अनेकदा प्रयत्न करुनंही वीज बिल कमी झालं नाही, त्यामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलले होते.
तर दुसरीकडे भाजप आणि मनसेनं राज्यभरात वीज बिल दरवाढीविरोधात आंदोलनं केली होती. मंगळवारी राज्यभरात ठिकठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी महावितरणच्या कार्यालयांची तोडफोड केली होती. नागरिकांमध्ये असलेल्या संतापाची भावना लक्षात घेता अखेर राज्य सरकार वीज बिलात सूट देण्याची शक्यता आहे.