कोरोना रुग्णांच्या संख्येने महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरून गेला आहे. आज राज्यात विक्रमी 8139 रुग्ण सापडले आहेत. तर 233 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात आत्तापर्यंत 10 हजार 116 जणांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यातल्या एकूण रुग्णांचा आकडा हा 2 लाख 46 हजार 600 एवढा झाला आहे. तर Active रुग्णांची संख्या 99 हजारांच्या वर गेली आहे. मुंबईत आज 1284 नवे रुग्ण सापडले. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 91745 वर गेली आहे. तर 39 जणांचा मृत्यू झाला.
मुंबईतल्या एकूण मृत्यूची संख्या 5244 तर मुंबईतल्या Active रुग्णांची संख्या 22782वर गेली आहे. आज 4360 एवढे रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने प्रचंड मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत असल्याने सरकारची चिंता वाढली आहे.
तर रुग्ण संख्या वाढत असल्याने अनेक शहरांमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्यात येत आहे. अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर गर्दी वाढल्याने रुग्णांच्या संख्येत ही वाढ झाल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.
दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला रोखण्यात धारावी मॉडेलचे कौतुक केले. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळख असलेल्या धारावीत सुरुवातीच्या काळात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत होती. धारावीतील घरांची रचना, मोठी लोकसंख्या, लहान जागा, चिंचोळ्या गल्ल्या यामुळे येथे कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका अधिक होता. अशा परिस्थितीत पालिकेने धारावीसारख्या अवघड भागात कम्युनिटी प्रसार होऊ दिला नाही, हे विशेष. यामध्ये आयुक्त इक्वाल सिंह चहल यांचा मोठा वाटा असल्याचे सांगितले जात आहे
पुणे शहर आणि परिसरात सातत्याने कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार पुणे शहरासह पिंपरी-चिंचवडमध्येही पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. 13 जुलै ते 23 जुलै या कालावधीत दोन्ही शहरांमध्ये कडक लॉकडाऊन असणार आहे. मात्र, या निर्णयामुळे पुणेकर नाराज झाले आहे. तसेच या निर्णयाला व्यापारी संघानेही कडाडून विरोध केला आहे. यावर आता अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.