मुंबईतील उपनगरातून प्रवास करणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना दिलासादायक बातमी आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर सध्या धावत असलेल्या उपनगरीय लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचे ठरविले आहे. मध्य रेल्वे मार्गावर आतापर्यंत 200 लोकल फेऱ्या धावत होत्या, यात आता 150 फेऱ्यांची वाढ करण्यात आली आहे. उद्या आषाढी एकादशीपासून या ज्यादा लोकल सोडण्यात येणार आहेत.
तर पश्चिम रेल्वे मार्गावर आतापर्यंत 202 लोकल फेऱ्या धावत होत्या, त्यात 148 फेऱ्यांची वाढ करण्यात आली असून पश्चिम रेल्वे मार्गावरही 350 लोकल फेऱ्या धावणार आहे. अशा पद्धतीने एकूण 350 फेऱ्यांची वाढ करण्यात आली आहे
केंद्र सरकारच्या काही विभागातील कर्मचाऱ्यांनाही राज्य सरकारच्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसमवेत लोकलमधून प्रवासाला यापूर्वीच परवानगी देण्यात आली असल्याचे स्पष्ट झाले आहे. रेल्वे मंत्रालयाने मुंबईतील वाढीव लोकल फेऱ्यांबाबत जे पत्रक काढले आहे, त्यात अत्यावश्यक सेवेत केंद्र सरकारचे कर्मचारी, सैन्य दलाशी संबंधित कर्मचारी, आयकर विभाग, जीएसटी आणि कस्टम विभाग यांना परवानगी देण्यात आली आहे.
याचबरोबर राष्ट्रीयकृत बँका, मुंबई पोर्ट ट्रस्ट, न्यायालयीन कर्मचारी आणि राजभवनातील कर्मचारी यांनाही या लोकल सेवेचा फायदा घेता येणार आहे.
दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यासह अनेक मोठ्या महानगरपालिकांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला. मात्र तरीही कल्याण डोंबिवलीत मात्र लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली नव्हती. त्यामुळे झालेल्या टीकेनंतर आता अखेर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने लॉकडाऊन जाहीर केला आहे