अंतिम वर्ष परीक्षा होणार की नाही, याबाबत संभ्रमाचं वातावरण असताना उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला आहे, अशी घोषणा तनपुरे यांनी केली आहे.
'महाविकासआघाडी सरकार विद्यार्थ्यांच्या बाजूने! अंतिम वर्ष परीक्षांबाबत आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक झाली. बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला. व्यावसायिक अभ्यासक्रमांबाबतही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय रेग्युलेटरी बॉडींना कळवण्याचा निर्णय झाला,' असं ट्वीट प्राजक्त तनपुरे यांनी केलं आहे.
राज्यपालांसोबत होणार संघर्ष?
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अंतिम वर्ष परीक्षा रद्द करणं कायदेशीरदृष्ट्या योग्य नसल्याचं मत व्यक्त केलं होतं.त्यानंतर राज्य सरकार आपल्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर ठाम असल्याने राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल असा संघर्षाचा नवा अध्याय पाहायला मिळेल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
भाजपचं टीकास्त्र
'आदि(त्य) घोषणा आणि मग होमवर्क.. म्हणून आता लपून-छपून बैठका घ्याव्या लागतात. वारंवार "परीक्षा रद्द" एवढेच जाहीर होत आहे. पण ATKT असलेल्यांबद्दल निर्णयाचे काय? निर्णय कधी याबाबत प्रसिद्धी माध्यमांना कुठलीच सूत्र माहिती देत नाहीत. दिवसागणिक विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता वाढत आहे. पदवी परीक्षा रद्द मग व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचे काय? तेही महाराष्ट्राचेच तरुण आहेत ना? मग त्यांना का वाऱ्यावर सोडताय? ATKT असलेल्यांशी सापत्न का वागताय? एकसंघ निर्णय घ्या..या तर महाराष्ट्र सरकारच्या पळ काढू आणि वेळ काढू भूमिका,' अशा शब्दांत भाजप नेते आशिष शेलार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.