सारथी संस्थेच्या मुद्यावरुन आज संभाजीराजे छत्रपती मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून सारथी संस्थेचा वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे अजित पवार यांनी संभाजीराजे यांना फोन करुन मुंबईत बैठकीचं निमंत्रण दिलं होतं.
मराठा समाजाच्या हितासाठी स्थापन झालेल्या संस्थेत संस्थेबाबत जे आंदोलन केलं त्याचा दबाव निर्माण झाल्याने हे निमंत्रण आलं असल्याचं छत्रपती संभाजी यांनी म्हटलेलं आहे. यापूर्वी सरकारने जी आश्वासने दिली ती पाळली नव्हती तरी देखील समाजाच्या हितासाठी आपण या चर्चेला जात असल्याचं छत्रपती संभाजी यांनी म्हटलं आहे
1)सारथी ही 'स्वायत्त' संस्था म्हणून टिकली पाहिजे. स्वायत्तते बाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.
2) जे अध्यादेश राज्यपाल शासन असताना गुप्ता नावाच्या अधिकाऱ्याने काढले ते सर्व रद्द केले पाहिजेत.
3) शासनाने कथित गैरव्यवहाराची चौकशी केली, तिच्या मध्ये काही तथ्ये आढळली का? किती रुपयांचा घोटाळा झाला? हे शासनाने जाहीर करावे. झालेला सर्व जमाखर्च हा ऑनलाईन करावा, अन्यथा सारथी ची जाणीव पूर्वक बदनामी केली म्हणून जबाबदार अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी.
4) तारदूत प्रकल्प हा समाजोपयोगी असून तो बंद करण्यात येऊ नये. उलट त्याची व्याप्ती वाढवण्यात यावी.
5) ज्या लाभार्थी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती मिळाली नाही ती लवकरात लवकर देण्यात यावी.
6) शासनाने नवीन कोण कोणत्या योजना कल्पिल्या आहेत, त्या जाहीर करण्यात याव्यात.
दरम्यान, सारथी संस्थेवरून गेल्या काही दिवसांपासून वातावरण तापलं आहे. संभाजीराजे छत्रपती आणि मराठा क्रांती मोर्च्याने या मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत नेमकं काय होतं, हे पाहावं लागेल