मुंबई-ठाण्यासह अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये पावसानं दडी मारली आहे. राज्यात पुढच्या 48 तासांत पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा पुढचे दोन दिवस चांगला जोर राहिल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
गेल्या आठवड्यात मुंबई-ठाण्यासह अनेक भागांमध्ये पावसानं जोर धडला होता मात्र त्यानंतर दडी मारली. पाऊस गेल्यानं तापमानात वाढ झाली असून उकाड्यानं नागरिक हैराण झाले आहेत. कोकण किनारपट्टीवर पावसानं विश्रांती घेतली असली तरीही गुरुवारी पुन्हा एकदा पालघर, रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस होईल असा अंदाज आहे.
उत्तर भारतात सक्रिय झालेल्या पावसामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, औरंगाबाद, जालना जिल्ह्यात आज आणि उद्या मुसळधार तर शुक्रवारी रिमझिम पावसाची शक्यता आहे. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना आणि शेतीसाठी आतूरतेनं वाट पाहणाऱ्या बळीराजाला पावसामुळे दिलासा मिळणार आहे