देशाला हादरावून सोडणाऱ्या पालघर साधुंच्या हत्या प्रकरणी कोणताही धार्मिक पैलू नसल्याचं पोलिसांनी कोर्टात दाखल केलेल्या आरोप पत्रात म्हटलं आहे. यावरून भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी पुन्हा एकदा राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली आहे.
'भगव्याला विरोध करणारे दोन पक्ष आणि भगव्याला गुंडाळून ठेवणारा तिसरा पक्ष सत्तेत असल्यामुळे ठेचून मारलेल्या भगव्या वेशातल्या साधुंना न्याय मिळेल तरी कसा? असा खोचक सवाल आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. आमदार भातखळकर यांनी यासंदर्भात एक ट्वीट करत महाविकास आघाडी सरकारला सवाल केला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पालघर जिल्ह्यात झालेल्या दोन साधू आणि त्यांच्या चालकाच्या हत्येप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. 'साधू आणि त्यांच्या चालकाची निर्घृण हत्या झाली होती. निर्जण आणि दुर्गम परिसरात हे गाव आहे. घटना घडताच आपले एसपी तिथे पोहोचले. 16 फेब्रुवारीला ही घटना घडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आरोपींना अटक केली. मुख्य 5 आरोपीही तुरुंगात आहेत. या प्रकरणातील कोणालाच सोडणार नाही. कोणी आग लावण्याचा प्रयत्न करू नये,' असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. आरोपींना शोधून काढणार शिक्षा करणार, हा धार्मिक हिंसाचार नाही, अफवेमुळे प्रकार घडला,' अशी माहितीही उद्धव ठाकरे यांनी दिली होती.
पालघर प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
पालघरमधील गडचिंचले गावात जमावाकडून दोन साधू आणि त्यांच्या चालकांच्या हत्येनंतर पोलीस यंत्रणा सज्ज झाल्याचे पाहायला मिळत असून राज्य राखीव दलाच्या तुकडीसह दीडशे ते दोनशे पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मात्र, पोलिसांसमक्ष साधूंची हत्या झाल्याने पोलिसांच्या भूमिकेसंदर्भात आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
या साधूंवर रात्री हल्ला झाला होता. त्यावेळी तेथील फॉरेस्ट चौकीवरील वनरक्षकाने पोलिसांना या हल्ल्याची माहिती दिली होती. त्यावेळी जखमी साधूंना फॉरेस्ट चौकीत बसवून ठेवले होतं. पोलिसांना हल्ल्याची कल्पना असताना त्यांनी जमावाला तातडीने पांगवले का नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जमावाच्या समक्ष त्या साधूंना फॉरेस्ट चौकीतून बाहेर काढल्यानंतर जमावाने वयोवृद्ध साधूवर लाठ्याकाठ्यांसह जबर हल्ला चढवला. त्यावेळी पोलिसांनी कोणताही प्रतिकार न करता बघ्याची भूमिका घेतल्याने तीन जणांची हत्या झाली. पोलिसांच्या एकूण कार्यपद्धतीवरच आक्षेप घेतला जात आहे.