सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीस स्थगिती दिल्यानंतर राज्यात विरोधी पक्ष असलेल्या भाजपानं ठाकरे सरकारवर टीका केली होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही याचा ठपका सरकारवर ठेवला होता. मराठा आरक्षणासंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर केलेल्या टीकेला शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आपल्या शैलीत उत्तर दिलं.
शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या आरोपांवरून राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले,”चंद्रकांत पाटील सध्या विरोधी पक्षामध्ये आहेत. विरोधी पक्षातील लोक अशा प्रकारचे भन्नाट आरोप करू शकतात. पण गेल्या काही वर्षांपासून सत्तेतील प्रत्येक पक्ष मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी शर्थ करत आहे. दुसरं असं की अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एक महत्त्वाची समिती काम करत आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्यावर काल निवेदन केलं आहे. मी या विषयावर जाहीरपणे बोलणार नाही, कारण मला तो अधिकार नाही. एकनाथ शिंदे त्या समितीवर आहेत. शरद पवार यांनीही दिल्लीत त्यावर भूमिका मांडली आहे. त्यामुळे कोणताही नवा वाद निर्माण होईल असं मी कोणतंही वक्तव्य करणार नाही. या समाजाला, बहुजन समाजाचा महत्त्वाचा घटक असलेल्या समाजाच्या मागण्या मान्य व्हाव्यात, या मताचा मी आहे,” अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली.
मुंबईची ताकद कमी करण्याचा प्रयत्न
या कार्यक्रमात मुंबईविषयी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले,”मुंबईची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गांजा, चरस, भांग पिणाऱ्यांचं समर्थन काही राजकीय पक्षांकडून केलं जात आहे. महाराष्ट्राला, मुंबईला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही लोकांना हा वाद पेटता ठेवायचा आहे. मुंबईतील संस्था बाहेर नेण्यात येत आहेत. मुंबईची आर्थिक ताकद कमी करण्याचा प्रयत्न होतोय,” असा आरोपही राऊत यांनी केला.