बॉलिवूडचा अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हा तपास मुंबई पोलिसांनी सीबीआयकडे सोपवला. या तपासादरम्यान आता दररोज नवनवी माहिती समोर येत आहे. दरम्यान, या प्रकरणात भाजपानं कधीही आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलं नसल्याचं वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं. माध्यमांशी संवाद साधताना विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
“या प्रकरणात भाजपाच्या कोणत्याही नेत्यानं आदित्य ठाकरे यांचं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या नाव घेतलेलं नाही. सुशांत सिंहप्रकरणी आता जी जी माहिती समोर येत आहे ती सर्वांना आश्चर्यचकीत करणारी आहे. सीबीआय येईपर्यंत हे खुलासे का झाले नाहीत हा एक नक्कीच प्रश्न आहे. याव्यतिरिक्त जे निरनिराळे प्रश्न उपस्थित होत आहेत त्याचीही उत्तरं देण्याची आवश्यकता आहे,” असं फडणवीस म्हणाले
आज जवळपास ४० दिवसांनंतर सीबीआय आली. माध्यमांमधून मला आठ हार्डडिस्क नष्ट करण्यात आल्या, किंवा काही पुराव्यांबाबत माहिती पाहायला मिळत आहे. यातून मुंबई पोलिसांवर काय दबाव होता किंवा अडचण होती अथवा राजकीय दबाव होता की त्यांनी याची तपासणी केली नाही असा नक्कीच प्रश्न उद्भवत असल्याचे ते म्हणाले. “आता सीबीआय सत्य बाहेर काढेल. परंतु हे जर आधी बाहेर आलं असतं तर आपल्याला सत्य लवकर समजलं असतं. काय घडलं कोण यामागे आहे हे समजलं असतं,” असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.