विरार : टाळेबंदीमुळे मागील तीन महिन्यांपासून बंद असलेली पश्चिम रेल्वेची उपनगरीय सेवा सोमवारपासून सुरू झाली. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना घेऊन सोमवारी विरार स्थानकातून पहाटे साडेपाच वाजता पहिली लोकल धावली. पोलीस बंदोबस्तात ओळखपत्र तपासून कर्मचाऱ्यांना प्रवेश देण्यात आला होता.
टाळेबंदीच्या पाचव्या टप्प्यानंतर शिथिलता आणल्यानंतर मोठय़ा प्रमाणात कार्यालये सुरू झाली आहे. रेल्वेने मात्र अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. विरार स्थानकातून सुटलेल्या पहिली लोकलमध्ये केवळ ७०० प्रवाशांना प्रवेश देण्यात आला होता. एका बाकावर एक प्रवाशी याप्रमाणे प्रवाशांना बसण्याची सुविधा करण्यात आली होती. स्थानकात कोणतीही गर्दी होऊ नये यासाठी स्थानकात रेल्वे पोलीस तथा महाराष्ट्र पोलिसांचा फौजफाटा तैनात होता. करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पश्चिम रेल्वेकडून विशेष काळजी घेतली जात आहे. सामाजिक अंतराचे पालन आणि रेल्वे गाडय़ांचे तसेच स्थानकातील आसनांचे नियमित निर्जंतुकीकरण केले जात आहे. यासाठी अतिरिक्त सफाई कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
रेल्वेच्या मुख्य माहिती जनसंपर्क अधिकारी रवींद्र भास्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार डहाणू ते चर्चगेट या स्थानकादरम्यान ही सेवा सुरू करण्यात आली आहे. यात विरार ते चर्चगेट अधिक गाडय़ा सोडल्या जाणार आहेत. सध्या अप आणि डाऊन मार्गावर १२ डब्यांच्या १४६ गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. यातील ७३ गाडय़ा ह्य विरार स्थानकातून दर पंधरा मिनिटांच्या अंतराने चर्चगेट स्थानकापर्यंत सोडल्या जातील, तर १६ गाडय़ा ह्य विरार ते डहाणू स्थानकादरम्यान सोडल्या जातील. सदरची रेल्वे सेवा ही पहाटे ५.३० पासून रात्री ११.३० पर्यंत चालवली जाणार आहे. या सर्व लोकल बोरिवलीपर्यंत जलद गतीच्या असून स्थानकापासून पुढे धिम्या गतीने धावतील. प्रवेशासाठी स्थानकातील तिकीट खिडक्यांवर तिकीट उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी ओळखपत्र दाखविल्यानंतर प्रवाशांना तिकीट प्राप्त होणार आहे. तसेच मासिक पासधारकांसाठी टाळेबंदीच्या दरम्यान रेल्वे सेवा बंद असल्याने त्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी त्यांना वाढीव दिवस दिले जाणार आहेत. स्थानकाच्या बाहेर फेरीवाले आणि वाहने उभी करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. सध्या लोकल सेवा सुरू झाल्याने बस सेवेवरील ताण कमी झाला आहे. आज बस थांब्यावर तुलनेने कमी गर्दी आढळून आली.
पंतप्रधान आणि रेल्वेमंत्र्यांचे आभार
मुंबईतील अत्यावश्यक सेवेसाठी वसई-विरारमधून मोठय़ा प्रमाणात कर्मचारी जात असतात. वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांनी मे महिन्यात मुख्यमंत्र्यांकडे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानंतर केंद्रीय रेल्वेमंत्र्याकडे पाठपुरावा केला होता. त्या मागणीची दखल घेत ही सेवा सुरू केल्याबद्दल ठाकूर यांनी रेल्वेमंत्री तसेच पंतप्रधानांचे आभार मानले आहेत.