बेळगावमध्ये नव्या वादाला तोंड फुटलं आहे. शुक्रवारी पिरणवाडी गावात संगोळी रायान्ना यांचा पुतळा बसवण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर रायन्ना यांचा पुतळा बसवल्याने पुन्हा एकदा वादाला सुरूवात झाली होती. यामुळे रस्त्यावर उतरलेल्या मराठी भाषिकांवर पोलिसांनी लाठीमार केला होता. या प्रकरणावर एकनाथ शिंदे यांच्याकडून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सीमा भाग समन्वयक मंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडून हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. मंत्री शिंदे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा यांना खरमरीत पत्रदेखील लिहले आहे. वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण देशाचे दैवत आहेत. मराठी भाषक विरुद्ध कन्नड भाषक वाद निर्माण होऊ देऊ नका. यापूर्वीच मनगुत्ती घटनेवरून महाराष्ट्रातील शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे आणखी वाद नको अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी पत्रात उल्लेख केला आहे.
तर पिरणवाडी - मनगुत्ती सारख्या घटना घडवून आणणाऱ्या कन्नड संघटनावर योग्य कार्यवाही करा अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे राज्यात मराठी भाषिक नाराज आहेत. हा वाद आणखी पेटवू नका असं सांगण्यात आलं आहे.