कोरोनामुळे यंदा दहीहंडी (Dahi Handi) साजरी करता येणार नाही, यावरुन सरकार आणि मनसेमध्ये चांगलीच जुंपली असून ठाण्यात याचे चांगलेच पडसाद उमटले. ठाण्यात जन्माष्टमीचे (Janmashtami) औचित्य साधून मनसैनिकांनी अनेक ठिकाणी दहीहंडी फोडली (MNS celebrate Dahi Handi in Thane). कुठे तीन थरांची तर कुठे चार तर कुठे पाच थर लावून मनसैनिकांनीच दहीहंडी फोडत सरकार विरोधात घोषणाबाजी केली.
ठाण्यातील वर्तकनगर येथील लक्ष्मी पार्क चौकात मनविसेचे जिल्हाप्रमुख संदिप पाचंगे आणि मनसैनिकांनी दहिहंडी लावून मानवी मनोरे लावून दहीहंडी फोडून मनसेचा झेंडा हातात घेवून सरकार विरोधात घोषणाबाजी केली. तर ठाण्यातील नौपाडा येथील मनसेचे मुख्य कार्यालय येथे देखील मनसैनिकांनी दहीहंडी फोडली. अशा प्रकारे अनेक ठिकाणी दहीहंडी फोडून मनसेने आपला सराकार विरोधात निषेध नोंदवला. तर पोलिसांनी रात्रीच अनेक मनसैनिकांची धरपकड सुरु केल्याने कार्यकर्त्यांची रात्रभर पळापळ सुरु होती.