एखादं संकट आल्यानंतर ते किती विध्वंसक ठरू शकतं, हे कोरोना व्हायरसच्या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून येत आहे. कारण कोरोना आणि लॉकडाऊनमुळे राज्यासह देशभरातील आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या शेकडो उच्चशिक्षित तरुणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.
लॉकडाऊनच्या काळात कंपनी आर्थिक तोट्यात गेल्याचं कारण देते अनेक बड्या आयटी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची 10 टक्क्यांपासून 50 टक्क्यांपर्यंत पगार कपात केली आणि अनेक कर्मचाऱ्यांना कामावरूनही काढून टाकण्यात आलं आहे. ही धक्कादायक बाब पिंपरी चिंचवडमधील नॅशनल इन्फर्मेशन टेक्नोलॉजी एम्प्लॉइज सिनेटकडे दाखल झालेल्या तक्रारींमुळे उघडकीस आली आहे.
आयटी कर्मचाऱ्यांना अशा पद्धतीने कामावरून काढून टाकणे हे बेकायदेशीर असल्याने त्या विरोधात कर्मचाऱ्यांनी हॅशटॅग 'जस्टीस फॉर एम्प्लॉइज' या नावाने ऑनलाइन आंदोलन सुरू केलं आहे. विशेष म्हणजे या आंदोलनाला देशभरातून तब्बल 68 हजार आयटीयन्सनी प्रतिसाद दिला आहे. तर या काळात ज्यांना नोकरीवरून काढलं गेलं अशा सुमारे 3 हजार आयटी कर्मचाऱ्यांनी आपले फोटो टाकून या आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग नोंदवला आहे.
देशभरात आर्थिक संकट गडद
कोरोना व्हायरसने सर्व जगालाच वेठीला धरलं आहे. या व्हायरसला रोखण्यासाठी जगभरात लॉकडाऊन करण्यात आलं. भारतातही गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे सगळी अर्थव्यवस्था ठप्प पडली आहे. गेल्या दोन महिन्याच्या काळात लोकांची मानसिकता तयार झाली आहे. त्यामुळे आता कोरोनासाठी मनाची तयारी झाली आहे. मात्र लॉकडाऊन नंतरचं आयुष्य, नोकरी, व्यवसाय याविषयी लोकांना सर्वात जास्त चिंता असल्याचं ‘IIM लखनऊ’ने केलेल्या अभ्यासात उघड झालं आहे.
Understanding public sentiment during lockdown या विषयावर हा ऑनलाईन सर्व्हे घेण्यात आला होता. त्यात लोकांना आपल्या भविष्याविषयी सर्वात जास्त चिंता वाटत असल्याचं स्पष्ट झालं आहे. 79 टक्के लोकांना या गोष्टींची चिंता आहे. तर 40 टक्के लोकांच्या मनात भीती निर्माण झालीय. तर 22 टक्के लोक दु:खी आहेत