महाविकास आघाडीतील सुरू असलेली धुसफूस हळूहळू दिसायला लागली आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तीनही पक्षांनी एकत्र येत सरकार स्थापन केल्यानंतर महिन्याभरात सरकार पडेल अशी खोचक टिका अनेकांनी केली होती मात्र 6 महिने महाविकासआघाडीनं हे सरकार टिकवलं असून आता मात्र त्यांच्यातील असणारी धुसफूस हळूहळू बाहेर येऊ लागली आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून काँग्रेसवर जोरदार प्रहार करण्यात आला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांच्यावर सामनातू खोचक टीका करण्यात आली आहे. 'काँग्रेस काय किंवा राष्ट्रवादी काय, राजकारणात मुरलेल्या शहाण्या लोकांचे पक्ष आहेत. कधी व किती कुरकुरायचे, कधी कूस बदलायची याचा अनुभव त्यांना आहे. सत्तेचा अमाप लोभ श्री. उद्धव ठाकरे यांना नाही. राजकारण हे अखेरीस सत्तेसाठीच असते व सत्ता कोणाला नको असे नव्हे, पण उद्धव ठाकरे सत्तेसाठी काहीही करतील असे नेते नाहीत. सगळ्यांच्या गळ्यात मंत्रिपदाचे हार पडले आहेत. त्यात शिवसेनेचा त्यागही मोलाचा आहे हे विसरता येणार नाही. '
बाळासाहेब थोरात आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी दिलेल्या मुलाखतीनंतर ही कुरबुर अधिक प्रकाशझोतात आली आहे. 'सरकारमध्ये जरा आमचेही ऐका! रशासनातील अधिकारी म्हणजे नोकरशाही वाद निर्माण करीत आहे. आम्ही काय ते मुख्यमंत्र्यांशीच बोलू!' असं अशोक चव्हाण यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर शिवसेनेनं काँग्रेसवर टीकेची झोड उठवली आहे.
मंत्रिपदावरून होणारा वाद शिवसेनेनं विधानसभेवेळी मिटवला. त्यानंतर आता पुन्हा एकदा काँग्रेसमधील जुनी खाट पुन्हा एकदा कुरकुर करायला लागल्याची खोचक टीका बाळासाहेब थोरात आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्यावर करण्यात आली आहे.