भाजपचे नेते आणि संरक्षण राजनाथ सिंग यांनी महाविकास आघाडीला सर्कस म्हटल्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. तसंच, जितेंद्र आव्हाड यांना टोलाही लगावला आहे.
शरद पवारांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यावर केलेल्या विदूषकाच्या टिकेवर आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
'राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्रात तिन्ही पक्षाचा जो कारभार सुरू आहे, त्यावर सर्कस अशी टीका केली होती. व्यक्तिगत मत व्यक्त करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पण शरद पवार हे खूप मोठे नेते आहे. त्यांच्यावर कायम टीका करण्यासाठी मी इतका मोठा नाही. परंतु, शरद पवार यांनीच मान्य केली की त्यांच्याकडे सर्कस आहे. सर्कस आहे, प्राणी आहे आणि विदूषक नाही. त्यामुळे त्यांच्याकडे सर्कस असल्याचं हे त्यांनीच मान्य केलं आहे. हे मी नाही बोललो ते शरद पवार बोलले' अशी टीका चंद्रकांत पाटलांनी केली.
तसंच, मी पुन्हा टीका केल्यामुळे आता जितेंद्र आव्हाड म्हणतील की, चंद्रकांत पाटील यांनी पवारांवर बोलू नये. शरद पवार यांच्याबद्दल माझ्या मनात आदर आहे. माझ्या मनात जो आदर आहे, तो आव्हाड यांच्यामध्येही नसेल आणि हे शरद पवार यांना सुद्धा माहिती आहे, अशी टोलाही पाटलांनी आव्हाडांना लगावला.
त्याचबरोबर, 'शेवटी हे राजकारण आहे. इथं एकाने बॉल मारला की, दुसरा त्याला टोलावतो. त्यामुळे हे फार लक्षात ठेवण्यासारखे काही नाही. राजनाथ सिंह यांनी आपले व्यक्तिगत मत व्यक्त केले होते, ते त्यांना मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे' असं म्हणून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्नही पाटलांनी केला.
काय म्हणाले होते आव्हाड?
'आपण कोणाबद्दल बोलतोय याचे भान तरी चंद्रकांत पाटलांनी ठेवावं. जणू काही ते दौऱ्यावर तत्पर जाणारे गडी आहेत, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी फेसबुकच्या माध्यमातून चंद्रकांत पाटील यांच्यावर शरसंधान साधलं होतं