मुंबई: 'महाराष्ट्रातील भाजपला जनतेने त्यांना सत्तेच्या अंगणातून हाकलून दिले आहे. भाजपवाले काही करू किंवा बोलू लागताच लोक त्यांना 'मेरे, आंगने में तुम्हारा क्या काम है?' असं विचारतात. यातून त्यांना वैफल्य आले असून त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे,' अशी घणाघाती टीका शिवसेनेनं केली आहे . करोनाची परिस्थिती हाताळण्यात उद्धव ठाकरे सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत भाजपनं सरकारविरोधात आंदोलन पुकारलं आहे. 'राज्यातील जनतेनं शुक्रवारी आपापल्या घराबाहेर पडून काळे मास्क, काळे शर्ट, काळी रिबीन, काळे बोर्ड घेऊन राज्य सरकारचा निषेध करावा,' असं आवाहन भाजपनं केलं आहे. 'सामना'च्या अग्रलेखातून शिवसेनेनं भाजपच्या या आंदोलनाचा जोरदार समाचार घेतला आहे. 'सारा देश करोनाविरुद्ध लढ्यात झोकून देऊन काम करीत असताना महाराष्ट्रातील भाजपला फालतू आंदोलनाचे डोहाळे लागले आहेत,' असं शिवसेनेनं म्हटलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरही टीका केली आहे. चंद्रकांत पाटील व इतर अनेक भाजप कार्यकर्त्यांच्या डोक्यावरचे केस साफ पांढरे होऊन त्यांची चांदी झाली आहे. मग आता त्या केसांना काळा कलप लावून ते अंगणातील रणांगणात उतरणार काय? महाराष्ट्र भाजपचा आदेश आहे की सर्वच काळे करा. हा सर्वच प्रकार म्हणजे येड्यांची जत्रा आहे.
प्रदेश भाजपचे ‘महाराष्ट्र बचाव आंदोलन’ म्हणजे नेमके काय? ठाकरे सरकारच्या हाती महाराष्ट्र सुरक्षित असल्याची भावना जनतेची आहे. त्यामुळे सध्याच्या उठवळ विरोधी पक्षापासूनच महाराष्ट्राला वाचवा असे सांगण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्र प्रकाशमान, तेजस्वी करण्याचे युद्ध सुरू असताना राज्य ‘काळे’ करण्याचे आंदोलन सुरू झाले आहे. डोमकावळ्यांचे हे फडफडणे औट घटकेचेच ठरेल, याविषयी आमच्या मनात शंका नाही. पाटील-फडणवीसांनी भान राखून वागावे-बोलावे. शहाण्यांना शब्दांचा मार पुरेसा असतो, पण विरोधकांत शहाणपण उरले आहे काय? -शिव सेना