भिन्न धर्मिय नाव धारण करुन मुलींची फसवणूक करणे आणि लग्नानंतर त्यांना धर्म परिवर्तानाची बळजबरी करणे, या प्रकराला लव्ह जिहाद असं म्हंटलं जातं. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या भाजप शासित राज्यांनी या प्रकाराला रोखण्यासाठी घटनात्मक तरतूद देखील केली आहे. मध्य प्रदेश सरकारच्या अध्यादेशाला राज्यपालांनी मान्यता दिल्यानंतर लगेच राजधानी भोपाळमध्ये या विषयावरचं एक प्रकरण समोर आलं आहे.
भोपाळमधील 26 वर्षांच्या तरुणीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या तरुणीनं आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहिली आहे. या चिठ्ठीमध्ये आदिल हा तरुण आपल्या मृत्यूला जबाबदार असल्याचं स्पष्ट केलं आहे. ‘आदिलनं नाव बदलून मुलीशी मैत्री केली होती,’ असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.
भोपाळच्या टीटी नगर परिसरातील ही घटना आहे. या भागातील तरुणीनं शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. या तरुणीच्या जवळ एक सुसाईड नोट सापडली. त्यामध्ये ‘माझे नाव पूजा आहे. मी आत्महत्या करत असून त्याला जबाबदार खलीक खान यांचा मुलगा आदिल खान आहे,’ असं तिनं लिहलं आहे.
या सुसाईड नोटमध्ये आदिलचा मोबाईल नंबर आणि त्याच्या घराचा पत्ता देखील लिहिला आहे. या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी तरुणाला अटक केली आहे.
‘नाव बदलून केली मैत्री’
मृत तरुणीच्या कुटुंबीयांनी आरोपीच्या विरोधात लव्ह जिहादचा आरोप केला आहे. “आदिलनं आपल्या मुलीशी बबलू हे नाव सांगून मैत्री केली होती. मुलीला त्याचं खरं नाव समजल्यानंतर तिनं त्याच्याशी असलेले संबंध तोडण्याचा प्रयत्न केला.’’ असा दावा तिच्या वडिलांनी केला आहे. भोपाळ पोलिसांनी मात्र अजून यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
मध्य प्रदेशातील कायदा काय सांगतो?
मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी शनिवारी धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2020 या अध्यादेशावर स्वाक्षरी केली आहे. या कायद्यानुसार प्रलोभन, फूस आणि जबरदस्तीच्या माध्यमातून धर्मांतर करणे आणि लग्न करण्यास भाग पाडणाऱ्या आरोपींना 10 वर्षांची शिक्षा आणि एक लाखांचा दंड अशी तरतूद आहे