स्थलांतरित मजुरांची ठाकरे सरकारला अजिबात काळजी नाही. हे सरकार त्यांची काळजी घेण्यात सपशेल अपयशी ठरलं आहे असा आरोप रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी केला आहे. माझं महाराष्ट्रातल्या स्थलांतरित मजुरांच्या अवस्थेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलणं झालं. त्यांनी मला सांगितलं की शक्य ती व्यवस्था करा पण महाराष्ट्रातले स्थलांतरित मजूर घरी गेले पाहिजेत. आम्ही त्यानुसार आमच्याकडून अर्थात केंद्राकडून सगळे उपाय योजतो आहोत. मात्र ठाकरे सरकारला स्थलांतरित मजुरांची काळजी नाही असं पियूष गोयल यांनी म्हटलं आहे
सध्या रेल्वेचे कर्मचारी दिवस-रात्र काम करत आहेत. आम्ही महाराष्ट्रासाठी १४५ ट्रेन पाठवल्या. त्याबाबतची सगळी माहिती राज्य सरकारला दिली आहे.मात्र आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ७४ ट्रेन सुटायच्या होत्या. सकाळपासून दुपारी १२.३० वाजेपर्यंत कोणीही प्रवासी या ट्रेन्समध्ये बसले नाहीत. तसंच आत्तापर्यंत २४ ट्रेन्स सुटल्या आहेत. ५० ट्रेन्स अजूनही फक्त उभ्या आहेत.
आम्हाला दिलेल्या माहितीनुसार १४५ पैकी ४१ ट्रेन्स पश्चिम बंगालमध्ये जाणार आहेत. मात्र तिथले मुख्य सचिव आणि इतर अधिकारी हे महाराष्ट्र सरकारच्या सातत्याने संपर्कात आहेत. ते सांगत आहेत तिथे अम्फान वादळाचा जो तडाखा बसला आहे त्या परिस्थितीत ४१ ट्रेन्स येणं शक्य नाही. अशीही माहिती गोयल यांनी दिली.
पश्चिम बंगालच्या समस्येवर अद्याप ठाकरे सरकारने कोणताही तोडगा काढलेला नाही. मात्र ठाकरे सरकारमध्ये या प्रश्नाबाबत कोणतीही एकवाक्यता नाही. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष महाराष्ट्रात सत्तेवर आहेत. मात्र त्यांच्या अंतर्गत भांडणात ते गुंतले आहेत त्यांना महाराष्ट्रातल्या मजुरांची चिंता नाही असंही गोयल यांनी म्हटलं आहे.