जालना जिल्हा कोरोना मुक्त होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत असतांनाच आज शुक्रवारी रात्री उशिरा परजिल्ह्यातून जालन्यात आलेल्या पाच संशयित रुग्णांचे अहवाल प्रयोग शाळेकडून पॉझिटिव्ह प्राप्त झाल्यामुळे जालना शहरासह जिल्ह्यातील जनतेत एकच खळबळ उडाली आहे. या पाच रुग्णांपैकी चार रुग्ण हे राज्य राखीव दलातील जालना येथील तुकडीतील जवान असून एक रुग्ण हा मुंबई येथून परतूर तालुक्यात परतला होता अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे. जालना येथे आतापर्यंत एकून तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून त्यापैकी दोन रुग्ण निगेटिव्ह झाले आहेत. भोकरदन तालुक्यातील पारध येथील 17 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या तरुणीवर जालना येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असून जालना जिल्हा कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करत असतांनाच आज शुक्रवारी रात्री उशिरा प्रथमच जालना जिल्ह्यात पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने सरकारी यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी आणि जिल्हा वासियानमध्ये खळबळ उडाली आहे. जालना येथील राज्य राखीव दलातील चार जवान नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथून बंदोबस्त करून तर परतूर तालुक्यातील सातोना परिसरातील एक व्यक्ती आज शुक्रवारी सकाळी जालना येथे परतल्यानंतर या पाचही संशयीत रुग्णांना जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येऊन आज सकाळी त्यांचे लाळेचे नमुने घेऊन ते औरंगाबाद येथील प्रयोग शाळेकडे तपासणीसाठी पाठवले होते. प्रयोग शाळेकडून या संशयित पाचही रुग्णाचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाल्यामुळे जिल्हा सरकारी यंत्रणेतील अधिकाऱ्यांसह जिल्हा वासीयांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे. पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या वाढल्यामुळे जिल्ह्यातील जनतेला आगामी कालावधीत अधिक संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे