दिल्लीच्या मध्यवर्ती भागात इस्रायली दूतवासाबाहेर शुक्रवारी कमी तीव्रतेचा बॉम्बस्फोट झाला. या स्फोटाचा तपास करण्यासाठी विशेष पथकाला बोलावण्यात आलं आहे. दरम्यान अशी माहिती समोर येते आहे की, या बॉम्ब हल्ल्याची जबाबदारी 'जैश-उल-हिंद'ने घेतली आहे. मात्र अशाप्रकारे कोणतीही एजन्सी अस्तित्वात आहे, असे सरकारी एजन्सीना देखील माहित नाही आहे. सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे ज्यामध्ये 'जैश-उल-हिंद' या बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेत असल्याचे म्हटले आहे.
या व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये असं म्हटलं आहे की, 'दिल्लीच्या हृदयात केलेला हा हल्ला आहे. सर्वशक्तिमान अल्लाहच्या कृपेमुळे आणि मदतीमुळे जैश-उल-हिंदच्या सैनिकांना दिल्लीतील उच्च सुरक्षा असणाऱ्या भागात घुसखोरी करण्यात आणि आयईडी हल्ला करण्यात यश मिळालं. अल्लाह इच्छूक असणाऱ्या हल्ल्याच्या सीरिजची ही सुरुवात आहे आणि भारतातील महत्त्वाच्या शहरांना यामध्ये लक्ष्य करण्यात येणार आहे. आणि भारत सरकारने केलेल्या अत्याचाराचा हा बदला आहे. वाट पाहा आणि आम्ही देखील वाट पाहतो आहोत.'
अशाप्रकारे धमकीवजा ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे देशातील मोठ्या शहरात सुरक्षा वाढवली जाण्याची शक्यता आहे. मुंबईत देखील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. राजधानी दिल्लीतला सर्वाधिक सुरक्षित मानला जाणारा ल्युटन्स झोन शुक्रवारी संध्याकाळी या बाँब स्फोटाने हादरला. या स्फोटात जीवितहानी झालेली नसली, तरी विजय चौकाजवळ झालेल्या स्फोटाने राजधानी हादरली आहे. देशभरातल्या महत्त्वाच्या शहरांतली सुरक्षा यंत्रणा कडक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेषतः मुंबई हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे.