नवी दिल्ली, 13 मे : कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन कऱण्यात आलं आहे. यामुळे देशात अडकलेल्या परराज्यांतील मजुरांसाठी श्रमिक स्पेशल ट्रेन सोडण्यात आल्या. यात दिल्लीतून देशातील राज्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी या रेल्वे सोडण्यात आल्या. राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या समन्वयाने श्रमिक स्पेशल ट्रेनमधून लोकांना घरी पाठवलं जात आहे.
देशात आतापर्यंत 642 श्रमिक स्पेशल ट्रेन सोडण्यात आल्याची माहिती भारत सरकारने दिली आहे. या सर्व ट्रेनमधून मिळून 7.90 लाख लोकांना त्यांच्या घरी पोहचवण्यात आलं. यात बिहार, झारखंड, उत्तर प्रदेशासह इतर राज्यातील प्रवासी मजुरांचा समावेश आहे.
कोरोना व्हायरसच्या लॉकडाऊनमुळे दुसऱ्या राज्यात अडकलेल्या प्रवासी मजुरांसाठी पुढच्या काही आठवड्यापर्यंत दररोज 100 श्रमिक स्पेशल ट्रेन चालवण्यास गृहमंत्रालयाने सांगितलं आहे. सोमवारी रेल्वे आणि राज्यांच्या नोडल अधिकाऱ्यांसह समीक्षेवेळी गृह मंत्रालयानं यासाठी व्यवस्था करण्याच्या सूचना केल्या आहेत.
श्रमिक स्पेशल ट्रेनमधून प्रवास करण्याआधी मजुरांचे स्क्रिनिंग केलं जात. त्यांच्या तपासणीनंतरच ट्रेनमध्ये बसण्यासाठी परवानगी मिळते. तसंच स्टेशनपासून ट्रेनमध्ये बसण्यापर्यंत सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जातं. रेल्वे प्रवासावेळी मास्क बंधनकारक करण्यात आला आहे.