देशभरात अनलॉक 1.0 अंतर्गत सोमवारपासून मॉल, हॉटेल आणि धार्मिक स्थळं खुली करण्यात आली. देशात लॉकडाऊनमध्ये सूट देण्यात आली असली तरी, कोरोनाबाधितांच्या संख्येत मात्र वाढ होतच आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत भारतात 9987 नवीन रुग्ण आढळून आले तर 266 लोकांचा मृत्यू झाला आहे. यासह भारतातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा हा 2 लाख 66 हजार 598 झाला आहे. मात्र असे असले तरी भारतासाठी ही चिंतेची बाब नाही आहे. याचं कारण आहे भारताचा रिकव्हरी रेट.
आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात 1 लाख 29 हजार 971 सक्रीय प्रकरणं आहेत. तर, 7466 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 लाख 29 हजार 214 रुग्ण निरोगी झाले आहे. यासह भारताचा रिकव्हरी रेट 48.46% आहे. त्यामुळं भारतासाठी ही चांगली बाब आहे.
महाराष्ट्रात एकाच दिवसात 109 जणांचा मृत्यू
24 तासांत महाराष्ट्रात कोरोनाचे 2553 नवीन रुग्ण समोर आले. यासह राज्यात आता एकूण 88 हजार 528 रुग्ण आहेत. तर, 109 जणांचा मृत्यू झाला आहे. यासह मृतांची संख्या 3,169 झाली आहे. तर, मुंबईत 50 हजार 085 नवीन रुग्ण आहेत. तर, आतापर्यंत 1709 लोकांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर 1661 रुग्ण निरोगी होऊन घरीही परतले आहे. यासह महाराष्ट्रातील निरोगी रुग्णांचा आकडा हा 40 हजार 975 झाला आहे.
भारत पाचव्या क्रमांकावर
कोरोनाबाधितांच्या आकड्यात भारतात आता जगातील टॉप-5 देशांमध्ये आला आहे. कोरोनाचं क्रेंद ठरलेल्या स्पेन आणि इटलीला भारतानं मागे टाकले आहे. भारताआधी अमेरिका, ब्राझील, रशिया, ब्रिटन यांचा क्रमांक लागतो. मात्र भारत 5व्या क्रमांकावर असला तरी इतर देशांच्या तुलनेत भारताचा रिकव्हरी रेट हा सर्वात जास्त आहे. भारताप्रमाणेच रशियामध्येही मृतांचा आकडा कमी आहे.