राज्यातील तळ कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र वादळी-वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. बुधवारी आणि गुरुवारी दोन दिवस हा अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग तर पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर आणि साताऱ्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उत्तर पुण्यात पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये मंगळवारी पावसानं हजेरी लावली होती तर बुधवारी पहाटेपासून ढगाळ वातावरण आहे.
राज्यात काही ठिकाणी तुरळ तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर पुणे, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सातार तर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन करण्यात आलं असून प्रशासनही अलर्टवर आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्याचं वातावरण बदललं आहे. यामुळे मान्सूनचा परतीचा प्रवासही लांबला आहे. गेल्या काही तासांत या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढल्यामुळे महाराष्ट्राच्या काही भागाला हवामान खात्याने सतर्कचा इशारा दिला आहे. बीड जिल्ह्यात मध्यरात्रीपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. नागपूर, यवतमाळ, वाशिम जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. मान्सूनचा प्रवास लांबल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.
आधी लॉकडाऊन आणि कोरोना आणि आता अवेळी होणाऱ्या या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान होत असल्यानं बळीराजा चिंतेत आहे. दुसरीकडे तेलंगणा, हैदराबादमध्ये मुसळधार पावसाचमुळे हाहाकार झाला आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची व्यवस्था केली जात आहे.