राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची बरे होण्याची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नोव्हेंबरनंतर महाराष्ट्र अनलॉकचे संकेत दिले होते. परंतु, कोणतेही आकडेवारी हातात नसताना राज्य अनलॉक करणे हा धाडसी निर्णय ठरेल, असा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशनने दिला आहे.
गेल्या सात महिन्यापासून राज्यात लॉकडाउन कायम आहे. अनलॉकची घोषणा करत अनेक उद्योग-धंदे आणि बाजारपेठा सुरू करण्यात आल्या आहे. मात्र, अद्याप मंदिरं, जिम यावर बंदी कायम आहे.
दैनिक लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, कोरोनाबाबत कोणतेही अनुमान आपल्याकडे काढण्याइतकी सध्याची परिस्थिती नाही. कोणतीही आकडेवारी आपल्याकडे तुर्तास नाही. त्यामुळे राज्य अनलॉक करण्याचा निर्णय घेतला तर ते धाडसाचे ठरेल. उलट या काळात खबरदारी घेण्याची गरज आहे, असं मत इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्य अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केले आहे.
तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनीही अनलॉक करण्याबाबत भूमिका स्पष्ट केली होती.
'कोरोना अजून आपल्यातून गेला नाही. जगात काही देशात तर याची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे आपल्याला सावधपणे पुढे जावे लागत आहे. काळजीपूर्वक निर्णय घ्यावे लागत आहेत. शासनाची जनतेप्रती जबाबदारी आहे. जनतेच्या प्रेमापोटीच मंदिरे, लोकल आणि जीमसंदर्भातील निर्णय आपण अजून घेतलेला नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले. तसंच, 'सुरू केलेली कोणतीही गोष्ट आपल्याला पुन्हा बंद होऊ द्यायची नाही. याचा पुनरुच्चार करतांना मुख्यमंत्र्यांनी जनतेला लॉकडाऊन लावण्याची वेळ पुन्हा येऊ देऊ नका, शिस्त पाळा, आरोग्य सांभाळा' असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले होते