करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू असून, या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून आज (२ जानेवारी) करोना वॅक्सीनसाठी देशातील प्रत्येक राज्यात ‘ड्राय रन’ (सराव फेरी) घेण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी देशातील नागरिकांना महत्वपूर्ण आवाहन केलं आहे.
जीटीबी रुग्णालयाचा दौरा केल्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन हे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “मी आवाहन करतो आहे की कोणत्याही अफवांकडे लक्ष देऊ नये. सुरक्षा आणि लसीची कार्यक्षमता सुनिश्चित करणे हे आमचे प्राधान्य आहे. पोलिओ लसीकरणाच्या वेळी देखील वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरवल्या गेल्या होत्या, परंतु लोकांनी ही लस घेतली आणि भारत आता पोलिओमुक्त झाला आहे.”
तसेच, चार राज्यांमधील ड्राय रन नंतर मिळालेल्या अभिप्रायांचा समावेश लसीकरणाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये करण्यात आला असल्याचेही डॉ.हर्षवर्धन यांनी यावेळी सांगितले. नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार आज सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशात ड्राय रन घेतला जात आहे.
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सांगितल्यानुसार, सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेशांच्या एकूण ११६ जिल्ह्यांमध्ये २५९ जागांवर आज COVID-19 वॅक्सीनसाठी ‘ड्राय रन’ घेण्यात येणार आहे.