पंढरपूर तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने दमदार हजेरी लावली. रविवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह पावसाने दमदार हजेरी लावली. तर शनिवारीदेखील पावसाने हजेरी लावली. गेले काही दिवस ‘ऑक्टोबर हिट’चा चटका सहन करावा लागला होता. मात्र परतीच्या पावसाच्या अंदाजानुसार तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसाने हवामानात बदल झाला असला तरी शेतकऱ्यांचे विशेषत: फळबागांचे नुकसान झाले आहे.
उन्हाचा चटका सहन करणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील नागरिकांना सलग दोन दिवस पडणाऱ्या पावसाने काहीसा दिलास मिळाला आहे. गेले काही दिवस दुपारी कडक ऊन तर रात्री गारवा असे विषम हवामान होते. मात्र परतीच्या पावसाने चांगलाच जोर लावल्याचे चित्र दिसून आले. शनिवारी रात्री विजांच्या कडकडाटासह पावसाने हजरी लावली. या २४ तासांत म्हणजेच शनिवारी जवळपास २१ मि.मी. सरासरी पावसाची नोंद झाली. यात भाळवणी येथे ४६ मि.मी, करकंब येथे ३९,भंडीशेगाव येथे २७ तर कासेगाव येथे २३ मिमी.पावसाची नोंद झाली. पंढरपूर येथे ४, तुनाग्त येथे ८ तर पुळूज येथे ६ मि.मी पावसाची नोंद झाली. तालुक्यात एकूण १८९ मि.मी. पावसाची नोंद झाली.
रविवारी दुपारपर्यंत ऊन पडले होते. मात्र साडे तीननंतर विजांचा कडकडाट सुरू झाला आणि पावसाची सुरुवात झाली. त्यानंतर पावसाने जोर धरला. शहरात अनेक ठिकाणी पाणी साठले होते. ग्रामीण भागात पावसाने हजेरी लावली होती. मात्र या पावसाने बळीराजाच्या चिंता वाढवल्या आहेत. विशेषकरून फळबागांचे या पावसाने नुकसान होणार आहे. गेल्या महिन्यात सलग तीन दिवस पाऊस पडून मोठे नुकसान झाले होते. त्याचे तातडीने पंचनामे झाले.मात्र नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी वाट पहावी लागत आहे. असे असले तरी ऑक्टोबर हिटचा चटका सहन करणाऱ्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.
सांगली जिल्ह्य़ात २४ तासात सरासरी २६ मिलिमीटर पाऊस
सांगली : जिल्हयात गेल्या २४ तासात सरासरी २६ मिलिमीटर पाऊस झाला असून या पावसाने उभ्या पिकाबरोबरच काढणीच्या अवस्थेतील पिकांचे मोठे नुकसान झाले. शनिवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसाने रात्रभर हजेरी लावली. जोरदार वाऱ्याने सांगली-आष्टा मार्गावर झाडे मोडून पडल्याने वाहतूक रात्रभर अन्य मार्गावरून वळविण्यात आली.
वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जिल्ह्याच्या सर्वच भागात कमी अधिक प्रमाणात परतीच्या मान्सूनने झोडपले. खरीप हंगामातील मागास सोयाबीन, भुईमूग काढणीची कामे अंतिम टप्प्यात असताना मुसळधार पाऊस आल्याने पिकांचे नुकसान झाले असून द्राक्षबागांमध्ये फळछाटणीनंतर लावण्यात आलेली कीटकनाशकाची पेस्टही धुवून गेली आहे.
गेल्या २४ तासात विविध ठिकाणी झालेला पाऊस असा- मिरज ४२.७, तासगाव १२.४, कवठेमहांकाळ १८.८, इस्लामपूर ४५.५, शिराळा ९.२, कडेगाव २२५.४, पलूस ३०.५, खानापूर २३, आटपाडी ३६.४ आणि जत १०.१ मिलिमीटर . जिल्ह्यात सरासरी २६.२७ मिलिमीटर पाऊस झाला असून सर्वाधिक पाऊस वाळवा तालुक्यात ४५.५ मिलिमीटर नोंदला गेला.
साताऱ्यात पावसाने पिके जमीनदोस्त ; सोयाबीन,भात पिकाला फटका
वाई: सातारा जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये मागील दोन दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊ स झाला. या पावसाने काढणीला आलेले व काढून ठेवलेले शेती पिकांचे नुकसान झाले.
शनिवार दुपारपासून सातारा जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊ स झाला. सातारा, वाई ,खटाव, माण, खंडाळा आदी अनेक भागात वादळी पावसाने हजेरी लावली. पावसामुळे काढणीला आलेले सोयाबीन, भात, खरीप ज्वारी, बाजरी, ऊस पिकांचे नुकसान झाले. सातारा जिल्ह्याच्या काही तालुक्यांमध्ये जोरदार पाऊ स पडत असल्यामुळे नागरिकांची आणि शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली.
आज अचानक अवकाळी आणि परतीचा पाऊ स जोरदार कोसळल्याने हवेत गारवा निर्माण झाला. या पावसामुळे खरिपाच्या काढण्यात आलेली व शेतात काढून ठेवलेली पिके भिजून नुकसान झाले. मागील काही दिवसांपासून तालुक्यांमध्ये खरिपाची पिके काढणीस वेग आला आहे.
भात कापणी करून शेतकरी शिवारात घरी नेण्याच्या बेतात होते. वाई , खंडाळा , सातारा तालुक्यामध्ये आज दुपारी विजेच्या लखलखाटात जोरदार पाऊ स झाला. या पावसात शेतातील पिके जमीनदोस्त झाली. ऊ स आडवा झाल्यामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले.
माण तालुक्यात अचानक पाऊ स आल्याने ताली फुटल्याने शेतजमिनी वाहून गेल्या. कांदा-चाळीतही पावसाचे पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. वाई, सातारा, कोरेगाव, खंडाळा तालुक्यात सोयाबीन, भात काढणी व मळणीचे काम सुरू आहे. काही शेतकऱ्यांनी मळणी करुन पीक शेतात ठेवले होते, ते भिजल्याने पिकाचे नुकसान झाले.
सोलापूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पाऊस ; सांगोल्यात वीज कोसळून दोघांचा मृत्यू
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात शेवटच्या पर्वातील हस्त व इतर नक्षत्रे कोरडी गेली असतानाच चित्रा नक्षत्राच्या पावसाने सर्वत्र जोमदार हजेरी लावली. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह रविवारी दुसऱ्या दिवशीही पावसाच्या सरी कोसळल्या. सांगोला तालुक्यात या पावसातच वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाला. या पावसामुळे शेतातील काढणीला आलेल्या सोयाबीनचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.
रविवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत २४ तासांत सरासरी २१.३ मिलीमीटर पाऊ स झाला. करमाळा येथे सर्वाधिक ३७.१ मिमी पाऊस झाला. तर पंढरपूर-२६.५, उत्तर सोलापूर -२५.९, अक्कलकोट-२५.७, माळशिरस-२५.५, बाशी-२३.७, मोहोळ-१९.६, दक्षिण सोलापूर-१७.२, माढा-११.५, मंगळवेढा-१०.९ आणि सांगोला—१०.१ याप्रमाणे पाऊ स झाला. आतापर्यंत जिल्ह्यात ११३.८ टक्के पाऊ स पडल्याची नोंद झाली असून यात बहुतांशी नदी, नाले, ओढे, तलावांमध्ये पाणी वाढले आहे.