जवळपास 50 दिवसांच्या दीर्घकाळानंतर केंद्र सरकारने रेल्वे सेवा सुरू केली आहे. यानंतर आता सरकार लवकरच विमानसेवा सुरू करण्याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे. CNN-News18 ला मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार सरकार 17 मे आधीच देशांतर्गत विमानसेवा सुरु करण्याची शक्यता आहे. यामध्ये केवळ उत्तम आरोग्य असणाऱ्या नागरिकांनाच प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे विमान उड्डाणासाठी आता नागरिकांना फारशी वाट पाहावी लागणार नाही, अशी शक्यता आहे. केंद्र सरकार येत्या एक-दोन दिवसात विमान उड्डाण सुरू करण्याबाबतचा निर्णय देऊ शकते. सूत्रांच्या माहितीनुसार अद्याप कोणताही निर्णय निश्चित करण्यात आलेला नाही. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेनुसार विमान उड्डाणासाठीचे नियम आखण्यात येणार आहेत. या एसओपींचे (Standard Operating Procedure) पालन करणे अनिवार्य राहिल.
सरकारकडून निश्चित करण्यात आलेले काही एसओपी
-दोन तासांपेक्षा कमी वेळाचा प्रवास असल्यास खाद्यपदार्थ न देण्याचा विचार सुरू आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. जेवण न देता केवळ स्नॅक्स देण्याचा विचार केला जाऊ शकतो.
-सूत्रांच्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यामध्ये केवळ 25 टक्के क्षेत्रांमध्येच विमानसेवा सुरू करण्याचा मानस आहे
-केवळ स्वस्थ लोकांना विमानातून प्रवास करण्याची परवानगी देण्यात येणार आहे
-कोणत्याही केबिन बॅगेजसाठी परवानगी दिली जाणार नाही
-केवळ वेब चेकइनची परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे
-फोनमध्ये आरोग्य सेतू अॅप असणे अनिवार्य असेल
-मास्क आणि ग्लोव्ह्ज देखील अनिवार्य
-जर प्रवासी याआधी कोव्हिड-19 संक्रमित असतील, तर त्यांना त्याबाबतची पूर्वसूचना देणारा फॉर्म भरणे आवश्यक आहे
-प्रवाशांना देण्यात आलेला एक फॉर्म भरणं अनिवार्य राहील. जर ते या दिवसात क्वारंटाइन राहिले असतील तर त्या संदर्भातील माहिती प्रवाशांना द्यावी लागेल
-मंत्रालयाने सूचवल्याप्रमाणे ज्यांचे शारिरीक तापमान जास्त असेल किंवा ज्यांचे वय अधिक आहे त्यांना प्रवासासाठी परवानगी न देण्याचा विचार आहे.