मुंबई, 8 मे : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेता ऋषी कपूर यांनी 30 एप्रिलला जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या चाहत्यांना त्यांचं अंतिम दर्शन सुद्धा घेता आलं नाही. लॉकडाऊनमुळे त्यांच्या अंतिम यात्रेला फक्त 20-25 लोकांना सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली होती. ज्यामुळे फक्त त्यांचे कुटुंबीयच त्यांच्या अंतिम यात्रेत सहभागी होऊ शकले. पण तुम्हाला माहित आहे का ऋषी कपूर यांनी स्वतःच्या निधन आणि अंत्य संस्कारांबाबत काही वर्षांपूर्वी एक वक्तव्य केलं होतं. जे त्यांच्या निधनानंतर अगदी खरं ठरलं.
ऋषी कपूर हे एक असामान्य व्यक्तिमत्व होतं. नेहमीच चेहऱ्यावर एक खास हास्य ठेवून वावरणारे ऋषी कपूर यांनी दिलखुलास आयुष्य जगले. पण काही वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या मृत्यूबाबत एक भविष्यवाणी केली होती जी त्यांच्या निधनानंतर खरी ठरली आहे. 28 एप्रिल 2017 ला त्यांनी ट्वीटरवर त्यांनी एक पोस्ट लिहिली होती. ज्यात त्यांनी लिहिलं होतं की, जेव्हा मी मरेन तेव्हा मला खांदा देणारं कोणी नसेल. हे ट्वीट त्यांनी विनोद खन्ना यांच्या निधनानंतर केलं होतं.
विनोद खन्ना यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्ययात्रेला बॉलिवूडमधील खूप कमी कलाकार सहभागी झाले होते. ज्यावर ऋषी कपूर यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी लिहिलं होतं, 'असं का? मी आणि माझ्यानंतरच्या सर्वांनी यासाठी तयार राहायला हवं. जेव्हा मी मरेन तेव्हा मला खांदा देणारं कोणी असणार नाही. आजकालच्या या कलाकारांवर मी खूप नाराज आहे.'
या ट्वीटमधून ऋषी कपूर यांना सांगायचं होतं की आताच्या कलाकारांना आपल्या पेक्षा मोठ्या असलेल्या कलाकारांबद्दल प्रेम उरलेलं नाही. त्यांनी हे ट्वीट केलं तेव्हा कोणालाही वाटलं नसेल की पुढे जाऊन त्यांचे हे शब्द खरे ठरतील. ऋषी कपूर यांच्या अंत्ययात्रेला कोणत्याही बॉलिवूड कलाकाराला सहभागी होता आलं नाही. त्यांच्या अंत्ययात्रेला फक्त त्यांच्या कुटुंबातले 20 सदस्य उपस्थित होते. एवढंच नाही तर लॉकडाऊनमुळे त्यांची लाडकी मुलगी रिद्धिमा सुद्धा त्यांना शेवटचं भेटू शकली नाही.