राम मंदिराच्या कामाला लवकरच सुरूवात होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. राम मंदिराच्या मुद्यावर बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांना नाव घेता टोला लगावला होता. शरद पवार यांनी केलेल्या विधानाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी पाठिंबा दिला आहे.
राम मंदिर उभारणीचं काम लवकरच सुरू होणार आहे. मोदींच्या हस्ते कामाचं भूमिपूजन होणार असून, दोन तारखाही निश्चित करण्यात आल्या आहे. भूमिपूजनाची वृत्त चर्चेत असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यावर भाष्य केलं होतं. सोलापूर दौऱ्यावर असताना झालेल्या पत्रकार परिषदेत “आम्हाला वाटते की करोना थांबवला पाहिजे आणि काहींना वाटते की मंदिर बांधून करोना जाईल,” असा टोला अप्रत्यक्षपणे शरद पवार यांनी मोदी यांना लगावला होता.
शरद पवार यांनी केलेल्या विधानावर काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी एक ट्विट केलं आहे. दिग्विजय सिंह यांनी पवारांच्या विधानाचं समर्थन केल असून, “पवार साहेब, तुम्ही योग्य बोललात. मी याच्याशी सहमत आहे. जर कदाचित मोदी-शाह हे तुमच्या म्हणण्याप्रमाणे चालले असते, तर देशाची ही अवस्था झाली नसती,” असं दिग्विजय सिंह यांनी म्हटलं आहे.
राम मंदिराच्या मुद्यावर पवार नेमकं काय म्हणाले होते?
“करोना हे देशावरचे मोठे संकट आहे. त्यावर यशस्वीपणे मात करण्यासाठी राज्य व केंद्र सरकार एकत्रित आले पाहिजे. एकमेकांशी योग्य समन्वय साधून काम झाले पाहिजे. करोनाचे भयसंकट परतवून लावण्यासाठी कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यायचे, हे प्राधान्याने ठरविले पाहिजे. परंतु, मंदिर बांधून करोनाचं संकट दूर होईल, असं काही मंडळींना वाटतं आहे. राम मंदिर बांधून करोना आटोक्यात येत असेल तर भूमिपूजन अवश्य करा. फक्त करोनाचं संकट दूर व्हावं हीच आमची इच्छा आहे,” असं पवार म्हणाले होते.