नवी दिल्ली : देशात करोना रुग्णांची संख्या ३ लाख ८ हजार ९९३ इतकी झाली आहे. एका दिवसात सर्वाधिक नव्या रुग्णांची भर पडली असून शुक्रवारी दिवसभरात ११ हजार ४५८ रुग्ण आढळले. दिल्लीतही चोवीस तासांमध्ये आणखी २ हजार रुग्ण वाढले. भारत आता करोनाचा फटका बसलेल्या जगभरातील देशांमध्ये चौथ्या क्रमांकावर आला आहे. सिक्कीम, लडाखसारख्या या ईशान्येकडील भागांमध्येही करोनाचा प्रदुर्भाव वाढू लागला आहे.
गेल्या चोवीस तासांमध्ये करोना रुग्णांचे मृत्यू ३८६ झाले असून सलग तिसऱ्या दिवशी तीनशेहून अधिक मृत्यू झाले आहेत. एकूण मृत्यू ८ हजार ८८४ झाले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या चोवीस तासांमध्ये ७,१३५ रुग्ण बरे झाले असून हे प्रमाण ४९.९५ टक्के झाले आहे. एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ५४ हजार ३२९ आहे. तर, १ लाख ४५ हजार ७७९ रुग्ण उपचार घेत आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या उपचाराधिन रुग्णांपेक्षा जास्त आहे. असे असले तरी करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असा निष्कर्ष काढणे योग्य नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेच्या आकडेवारीनुसार, आत्तापर्यंत ५५ लाख ७ हजार १८२ नमुना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
अजूनही महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली, गुजरात या चार राज्यांमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. महाराष्ट्राने १ लाखाचा आकडा पार केला आहे तर, दिल्लीमध्ये ३६ हजारून अधिक रुग्णांनी नोंद झाली आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये २१३७ रुग्णांची वाढ झाली. एकूण मृत्यूही १,२१४ झाले आहेत.
वास, चव नष्ट होणे ही नवी लक्षणे
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने करोनाच्या लक्षणांमध्ये आणखी दोन लक्षणांचा समावेश केला आहे. अचानक वास व चव या दोन संवेदना नाहीशा झाल्या असतील तर व्यक्तीला करोनाची बाधा झालेली असू शकते. ताप येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, घसा खवखवणे वा दुखणे, थकवा येणे, नाक गळणे, अंगदुखी, पोट बिघडणे आदी करोनाची लक्षणे मानली जातात.
आज अमित शहा-केजरीवाल चर्चा
दिल्लीत करोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असून त्या तुलनेत रुग्णालयांमध्ये खाटांची संख्या अपुरी पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व नायब राज्यपाल अनिल बैजल यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे