करोनाची वाढती रुग्णसंख्या आणि ओमायक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव यामुळे काही राज्यांनी निर्बंध लावले असून आता केंद्रानेही पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. केंद्राने ओमायक्रॉन रुग्ण जास्त असणाऱ्या तसंच कमी लसीकरणाचा वेग कमी असणाऱ्या राज्यांमध्ये पथकं पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. १० राज्यांमध्ये या टीम पाठवण्यात येणार असल्याचं आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे
ज्या राज्यांमध्ये पथकं पाठवणार आहेत त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे. महाराष्ट्रासोबत केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, मिझोरम, कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड आणि पंजाब या राज्यांचा समावेश आहे.
या पथकांकडून नेमकी कशाची पाहणी केली जाणार आहे –
ही पथकं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, तसंच पाळत ठेवणे आणि प्रतिबंधात्मक कारवायांवर लक्ष ठेवणार आहेत. यासोबत करोना चाचणी, करोनासंबंधित नियमांचं पालन, त्यांची अंमलबजावणी, रुग्णालयात उपलब्ध बेड्स यांची पाहणी केली जणार आहे. रुग्णवाहिका, व्हेंटिलेटर आणि मेडिकल ऑक्सिजन यांची उपलब्धता कितपत आहे याचीही माहिती घेतली जाईल. सर्वात महत्वाचं म्हणजे लसीकरणाची प्रगती कशापद्धतीने सुरु आहे याकडे लक्ष दिलं जाईल.
जगात चौथी लाट, देशात गंभीर इशारा
जग करोना साथीच्या चौथ्या लाटेचा सामना करीत असल्याचे निदर्शनास आणत केंद्र सरकारने शुक्रवारी गंभीर इशारा दिला. नाताळच्या पार्श्वभूमीवर लोकांनी गर्दी आणि अनावश्यक प्रवास टाळावा, करोना प्रतिबंधक नियम पाळावेत, त्याचबरोबर त्वरित लसीकरण करावे, असे आवाहन केंद्राने केले. गेल्या २४ तासांत देशात करोनाच्या नव्या उत्परिवर्तित विषाणूचे ३५८ रुग्ण आढळले.
शनिवारी देशातील ओमायक्रॉन रुग्णसंख्येने ४०० चा टप्पा ओलांडला. सध्या देशात ओमायक्रॉनचे ४१५ रुग्ण आहेत. यामुळेच अनेक राज्यांनी निर्बंध जाहीर केले असून नाईट कर्फ्यूचीही घोषणा करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात निर्बंध, रात्रीची जमावबंदी
राज्यात काही नवे निर्बंध लागू करण्यात आले असून त्यानुसार रात्री ९ ते सकाळी ६ पर्यंत पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. विवाहसोहळे, धार्मिक, सामाजिक, राजकीय कार्यक्रमांमध्ये उपस्थितीवर नियंत्रण आणण्यात आले आहे. उपाहारगृहे, चित्रपट व नाट्यगृहे, व्यायामाशाळांमध्ये ५० टक्के उपस्थितीचे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. नाताळ, नववर्ष समारंभ साजरे करताना गर्दी होऊ नये यासाठीच ही खबरदारी घेण्यात आली आहे. या निर्बंधांचा उपाहारगृहे आणि मनोरंजन क्षेत्रांना मोठा फटका बसणार आहे. नवे निर्बंध शुक्रवारी मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत.